EVM मध्ये गडबड आहे अशी शंका घेणाऱ्या शरद पवार यांनी पुन्हा एकदा एक गुगली टाकला आहे. कारण त्यांनी आता म्हटलं आहे की दोष फक्त EVM, VVPAT चा नाही तर निवडणूक अधिकाऱ्यांचाही आहे. ज्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे मतमोजणीसाठी ही मशीन्स येतात ते अधिकारीही दोषी असू शकतात असं आता शरद पवार यांनी म्हटलं आहे. आम्ही या प्रकरणी तंत्रज्ञांशी आणि ईव्हीएम तज्ज्ञांशी सखोल चर्चा करणार आहोत असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच या सगळ्यांशी चर्चा झाल्यावर आम्ही विरोधी पक्षातल्या नेत्यांशीही चर्चा करू असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

आपण ज्या उमेदवाराला मत देतो आहे त्याला ते जात नाही हे मतदारांना कळलं तर ते सध्या शांत रहातील पण ते भविष्यात कायदा हातात घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. मतदारांनी कायदा हातात घेऊ नये म्हणून प्रयत्न केले जाणे आवश्यक आहेत तेच आम्ही करतो आहोत असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

याआधी  १ मे रोजीही शरद पवार यांनी ईव्हीएमवर शंका घेतली होती. तसेच निवडणूक प्रचारादरम्यानही मी अशी काही ईव्हीएम पाहिली आहेत ज्यामध्ये राष्ट्रवादीचं बटण दाबल्यास कमळाला मत गेलं हे मी डोळ्यानं पाहिलं आहे असंही वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून नेटकऱ्यांनी त्यांची खिल्लीही उडवली. आता फक्त ईव्हीएमच नाही तर निवडणूक अधिकारीही दोषी असू शकतात असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

१ मे रोजी काय म्हटले होते शरद पवार? 

ईव्हीएममध्ये फेरफार शक्य असल्याचे मी ऐकून आहे. या सर्व गोष्टी चिंताजनक आहेत. यंदा भाजपा नेते सांगतात तसा अनपेक्षित निकाल लागला तर लोकांचा निवडणुकीवरचा विश्वास उडेल आणि एकदा विश्वास उडाला की ते कोणत्याही टोकाला जातील असं त्यांनी म्हटलं होतं.

२३ मे रोजी लागलेल्या लोकसभा निवडणूक निकालात भाजपाला पूर्ण बहुमत मिळालं. ३०३ जागा मिळवत भाजपाने एकहाती सत्ता काबीज केली. तर भाजपासह घटक पक्षांना म्हणजेच एनडीएला ३५० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा ईव्हीएमबाबत शंका उपस्थित करतानाच निवडणूक अधिकाऱ्यांचाही दोष असू शकतो असं म्हटलं आहे.