भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी हरियाणातील जींद येथील एका सभेद्वारे येथील आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यावेळी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, हरियाणाचे प्रभारी अनिल जैन यांच्यासह अन्य मंत्र्यांची उपस्थिती होती.

गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी काँग्रसवर टीका करताना म्हटले की,  सरदार वल्लभभाई पटेल यांनी पाहिलेले एकसंध भारताचे स्वप्न पूर्ण होण्यात कलम ३७० हा अडसर ठरत होता.  मोदी सरकारने ७५ दिवसांमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वप्न पूर्ण केले. जवळपास ७० वर्षे काँग्रेस सरकारला मतपेटीच्या लालसेमुळे जे करता आले नाही. ते मोदी सरकारने केवळ ७५ दिवसांतच करून दाखवले. कलम ३७० आता इतिहास जमा झाले आहे, हरियाणातील शहीद जवानांना यापेक्षा मोठी श्रद्धांजली असू शकत नाही.

यावेळी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी देखील गृहमंत्री अमित शहा यांच्या कामाचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, स्वातंत्र्यानंतर तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताला एकसंध बनवण्यासाठी जसे कार्य केले होते. तसेच काम आता कलम ३७० हटवून गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.

यावेळी अमित शहा म्हणाले की, हरियाणात भाजपाचे बहुमताचे सरकार येईल, याचा मला विश्वास आहे. मी मागील विधानसभा निवडणुकीवेळी या ठिकाणी आलो होतो, तेव्हा देखील तुम्ही बहुमत देत भाजपाचे सरकार आणले होते. त्यानंतर लोकसभेवेळी आलो तेव्हा तुम्ही ३०० चा आकडा पार करून दिला. यंदाच्या निवडणुकीतही हरियाणाची जनता पंतप्रधान मोदींना आशिर्वाद देईल याची मला खात्री आहे. तसेच, यंदा ४७ नाही तर ७५ जागा मिळाल्यावर भाजपाचा विजय मानला जाईल, मिशन -७५ हरियाणाच्या जनतेच्या आशिर्वादाशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही, मागील पाच वर्षात खट्टर सरकारने चांगले काम केले असल्याचेही गृहमंत्री शहा यांनी सांगितले.