नोटाबंदीच्या निर्णयामागे सरकारचा उदात्त हेतू असून त्यासाठी लोक त्रास सहन करायला आहेत, असे मत 'आर्ट ऑफ लिव्हिंग' प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या निश्चलनीकरणाच्या निर्णयाबद्दल मला आनंद आहे. त्यामुळे पहिल्यांदाच लोकांकडे किती पैसा आहे, हे उघड झाले आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर लोकांची काही प्रमाणात गैरसोय आहे. त्यासाठी व्यवस्थेत काही सुधारणा करणेदेखील आवश्यक आहे. मात्र, एका उदात्त हेतूसाठी लोक काही काळ त्रास सहन करायला तयार आहेत, असे श्री श्री रविशंकर यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला बनावट चलन आणि काळ्या पैशाला चाप लावण्यासाठी ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर देशभरात अभुतपूर्व चलनटंचाई निर्माण होऊन एकच गोंधळ उडाला होता. त्यामुळे सामान्य नागरिकांना दैनंदिन व्यवहारात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले होते. आता १५ दिवस उलटून गेल्यानंतर परिस्थिती काहीप्रमाणात सुधारली आहे. मोदी सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षांनी कडाडून टीका केली होती. मात्र, अनेकजणांनी नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थनही केले होते. दरम्यान, या पार्श्वभूमीवर सरकारकडून नरेंद्र मोदी अॅपवरून देशातील जनतेचा कौल जाणून घेण्यात आला. या जनमताच्या प्रारंभिक निकालांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक लोकांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले. या सर्वेक्षणात ५ लाख यूजर्सनी सर्व्हेत सहभाग नोंदवल्याचा दावा करत नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ट्विटरवरून ही आकडेवारी प्रसिद्ध केली होती. देशात काळा पैसा असल्याचे ९८ टक्के लोकांचे म्हणणे आहे. भ्रष्टाचार व काळ्या पैशाविरोधात लढाई आवश्यक असल्याचे मत ९९ टक्के लोकांनी नोंदवले आहे. ९० टक्के लोकांनी सरकारने काळा पैसा रोखण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. ९२ टक्के लोकांनी भ्रष्टाचारविरोधात मोदी सरकारचे प्रयत्न योग्य असल्याचे म्हटले आहे. ९० टक्के लोकांनी ५०० व १००० रूपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. तर ९२ टक्के लोकांच्या मते या निर्णयामुळे काळे धन, भ्रष्टाचार आणि दहशतवादावर लगाम लावण्यास मदत मिळेल असे म्हटले आहे. या सर्वेक्षणात ५०० व १००० रूपयांच्या जुन्या नोटा बंद करण्यासंबंधीचे प्रश्न विचारण्यात आले होते.