नोटाबंदीनंतर चलनात आलेली ₹२००० ची नोट रद्द करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे केंद्र सरकारकडून मंगळवारी राज्यसभेत स्पष्ट करण्यात आले. ही नोट बंद होणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सर्वसामान्यांमध्ये सुरु होती. मात्र सरकारच्या स्पष्टीकरणानंतर आता ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

केंद्रिय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी राज्यसभेत याबाबत स्पष्टीकरण दिलं. ₹२००० ची नोट रद्द होणार नाही त्यामुळे कुठलीही काळजी करण्याचे कारण नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रश्नोत्तरांच्या तासामध्ये ₹२००० ची नोट रद्द करण्याची सरकारची काही योजना आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता, त्याला केंद्र सरकारकडून लेखी उत्तर देण्यात आले.

दरम्यान, समाजवादी पार्टीचे खासदार विश्वंभर प्रसाद निशाद यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. ₹२००० ची नोट चलनात दाखल झाल्यामुळे काळ्या पैशाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सरकार ही नोट रद्द करुन पुन्हा ₹१००० ची नोट चलनात आणत असल्याची चर्चा जनतेमध्ये सुरु आहे, असे निशाद यांनी म्हटले होते. यावर अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी उत्तर दिले.