संघ परिवारातील राष्ट्रीय मुस्लिम मंचाने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीवर शिवसेनेने टीका केली असून, हा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ढोंगीपणा असल्याचे म्हटले आहे. इफ्तार पार्टी आयोजित केल्याबद्दल भाजपकडून काँग्रेसवर टीका केली जायची. आता हेच इफ्तार पार्टी आयोजित करू लागले आहेत, असे म्हणत शिवसेनेने या निमित्ताने पुन्हा एकदा भाजपवर हल्ला चढवला आहे.
राष्ट्रीय मुस्लिम मंचाने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले आहे. दिल्लीमध्ये २ जुलै रोजी ही पार्टी आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय मुस्लिम मंचाचे मार्गदर्शक इंद्रेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली या इफ्तार पार्टीचे नियोजन करण्यात येते आहे.