जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या दहशतवादी हल्ल्याची माहिती कळताच सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, दहशतवादी हल्ल्यानंतर पळून जाण्यात यशस्वी ठरले. या घटनेबाबत अधिक माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.


काश्मीर गेल्या काही महिन्यांपासून पेटला असून दहशतवादी हल्ले आणि पाकिस्तानी रेंजर्सकडून होणाऱ्या गोळीबारात निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. दरम्यान, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना शोधण्यासाठी भारतीय जवान सातत्याने शोध मोहिम हाती घेत असून त्यांचे अड्डे उध्वस्त करीत आहेत. मात्र, तरीही दहशतवादी हार मानायला तयार नाहीत.

दरम्यान, सोमवारी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन कुख्यात कमांडर समीर टायगर आणि आकिब खान यांचा खात्मा केला. या घटनेत एका मेजरसहित दोन जवानही जखमी झाले आहेत. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.