कर्जबुडव्या विजय मल्ल्याला भारतात आणलं जाणार आहे. कुठल्याही क्षणी त्याला घेऊन मुंबईत विमान लँड होण्याची शक्यता आहे. विजय मल्ल्याच्या विरोधात ९ हजार कोटींचा घोटाळा केल्याचं प्रकरण दाखल आहे. यूके येथील कोर्टाने १४ मे रोजीच त्याच्या प्रत्यार्पणावर मोहोर लावली होती. त्यामुळे त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला होता. आता कोणत्याही क्षणी विजय मल्ल्याला घेऊन तपास यंत्रणा मुंबईत येऊ शकतात. तपास यंत्रणांनी IANS ला याबाबतची माहिती दिली आहे. मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगातच विजय मल्ल्याची रवानगी केली जाणार आहे.

यू के येथील कोर्टाने १४ मे रोजी विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर शिक्कामोर्तब केलं होतं. नियमानुसार भारत सरकारने त्या तारखेपासून २८ दिवसांच्या आत यूकेहून भारतात आणलं पाहिजे. प्रत्यार्पणाची कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे.

विजय मल्ल्याला मुंबईत आणण्यात येईल तेव्हा वैद्यकीय पथक त्याच्या प्रकृतीची तपासणीही करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीआय आणि ईडीचे अधिकारी विजय मल्ल्यासोबत आहेत. विजय मल्ल्याला थेट कोर्टात नेण्यात येईल. त्याची रवानगी ऑर्थर रोड तुरुंगात केली जाणार आहे.

विजय मल्ल्याला लिकर किंग ही उपाधीही लावण्यात आली होती. तसंच बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचा मालक विजय मल्ल्यावर १७ बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. मार्च २०१६ मध्ये विजय मल्ल्या भारत सोडून ब्रिटनला पळाला होता.