प्रख्यात कवी आणि एकेकाळी आम आदमी पक्षाचा प्रमुख चेहरा राहिलेले कुमार विश्वास यांनी भारतीय वायूसेनेच्या शौर्याचे कौतुक करत टीकाकारांवर निशाणाही साधला आहे. यावेळी पुरावे मागणाऱ्यांच्या हातात काही ग्रॅम बॉम्ब ठेवले पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला आहे. त्याचबरोबर त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. पीओकेत दहशतवादी तळ नष्ट केल्याचे वृत्त आल्यानंतर कुमार विश्वास यांनी ट्विट केले. मागील वेळी सर्जिकल स्ट्राइकवर झालेल्या राजकीय वक्तव्यांचा समाचार घेताना त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, यावेळी #surgicalstrike2 चा कोणी पुरावा मागितला तर भारतीय वायूसेनेला विनंती आहे की, तुमच्या धाडसी जवानांनी जसा पुरावा इम्रान खानला दिला आहे. तसाच १००-२०० ग्रॅम पुरावा म्हणून अशा लोकांच्या हातात ठेवा. भारताने पाकिस्तानला टोमॅटो पाठवण्यावर बंदी घातल्यानंतर पाकिस्तानी नेत्यांनी केलेल्या वक्तव्याच्या बहाण्याने इम्रान खान यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, अनेक दिवसांपासून बालाकोटवाले भारतीय टोमॅटोसाठी रडत होते. भारतीय वायूसेनेने त्यांना एका रात्रीत पहिली खेप जैश ए मोहम्मदच्या कंट्रोल रूमला पाठवली आहे. शांततेचा पांढरा रंग तर तुम्हाला समजत नाही. आता इमरान खान यांना लाल रंग पसंत पडला असेल अशी आशा आहे. जितके मागाल तितके टोमॅटो पाठवू, वचन आहे. अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानवर टीका केली आहे.