पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून शेजारी राष्ट्र पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानचे थेटपणे नाव न घेता दहशतवादी कारवायांना खतपाणी घालत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने त्या देशावर निर्बंध लादले पाहिजेत आणि त्यांना एकटे पाडले पाहिजे, अशी मागणी मोदी यांनी केली. आसियान राष्ट्रांच्या १४ व्या शिखर परिषदेमध्ये बोलताना मोदींनी दहशतवादाचा मुद्दा प्राधान्याने मांडला.
ते म्हणाले, आमच्या शेजारील एका राष्ट्राकडून केवळ दहशतवादाला खतपाणी घातले जाते आणि त्याचीच निर्यात केली जाते. आता या देशावर लगेचच निर्बंध लादण्याची आणि आंतराष्ट्रीय समुदायाने त्या देशाला एकटे पाडण्याची वेळ आली आहे. यापुढे केवळ दहशतवाद्यांना लक्ष करून चालणार नाही. तर ज्यांच्याकडून त्यांना खतपाणी घातले जाते, त्यांनाही लक्ष्य केले पाहिजे, असेही मोदी यांनी म्हटले आहे.
सध्याच्या समाजात दहशतवाद हा सर्वांत मोठा धोका आहे. त्यामुळे त्याच्याशी लढा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र आले पाहिजे. केवळ दहशतवाद्यांना लक्ष्य करून चालणार नाही. तर ज्या देशांकडून दहशतवादाला खतपाणी घातले जाते. धोरणात्मकपणे दहशतवादाचा वापर केला जातो, त्या देशाविरुद्धच गंभीर कारवाई केली पाहिजे, असे मोदी यांनी म्हटले आहे.