संविधान बदलण्याच्या वक्तव्यावर संसदेत माफी मागून एक महिना पूर्ण होण्याआधीच केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बुद्धिजीवी आणि साहित्यिक हे केवळ सरकार लाभ मिळवण्यासाठी आपले काम आणि कलांचे प्रदर्शन करतात, असे वक्तव्य करून कर्नाटकमध्ये खळबळ उडवून दिली आहे. बेळगावी येथे ‘स्किल्स ऑन व्हिल्स’ या विषयावर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

साहित्यिक जे काही लिहितात ते साहित्य बनते. त्यांच्या लेखनाला कोणतीही प्रासंगिकता किंवा अर्थ नसतो. फक्त सरकारी जमीन घेण्यासाठी ते असे करतात. हे तथाकथित बुद्धिजीवी मला मनुष्य होण्यास सांगतात. मी काय जनावर आहे का ? मनुष्य जन्मानंतर आपले पुढील लक्ष्य हे देवतांसारखे होण्याचा असला पाहिजे. या सर्वांमध्ये दूरदृष्टीचा अभाव आहे. त्यांनी अशी टिप्पणी करणे बंद केले पाहिजे, असे हेगडे म्हणाले.

हेगडे यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यातील लेखकांनी यावर तीव्र शब्दांत आक्षेप नोंदवला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तर हेगडेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणे म्हणजे ‘वेस्ट ऑफ एनर्जी’ असल्याचे म्हटले. खासदार या नात्याने आपली वर्तणूक कशी असावी, काय बोलावे हे त्यांना समजायला हवे. ते बेजबाबदार व्यक्ती आहेत, अशा शब्दांत सिद्धरामय्या यांनी टीका केली.

यापीर्वी आपल्या वक्तव्यामुळे संसदेसमोर माफी मागावी लागल्याचे हेगडे यांनी लक्षात ठेवायला हवे होते, असे लेखक के एस भागवन यांनी म्हटले. मला वाटले होते की, ते आता सुधारतील आणि समजुतीने बोलतील. कोणतेही साहित्य सरकारी भूखंड किंवा इतर लाभा घेण्यासाठी लिहिलेले नसते, असेही ते म्हणाले.