आसामच्या नागाव- कर्बी अंगलाँग जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या टेकडीवर आज १८ रानटी हत्तींचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. जंगलात वीज कोसळल्याने हे मृत्यू झाल्याचं वनाधिकाऱ्यांना प्राथमिक तपासातून लक्षात आलं आहे. आसामचे प्रधान वनसंरक्षक अमित सहाय यांनी सांगितलं की बुधवारी ही घटना घडली आहे. काठियाटोली रांगांमधल्या राखीव वनक्षेत्रामधल्या टेकडीच्या परिसरात ही घटना घडल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हे १८ हत्ती दोन वेगवेगळ्या ठिकाणी आढळल्याचंही त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, ४ हत्ती एका ठिकाणी सापडले तर १४ हत्ती दुसऱ्या ठिकाणी आढळून आले आहेत. प्राथमिक तपासातून हे समोर आलं आहे की या हत्तींचा मृत्यू वीज कोसळल्याने झाला आहे. वन विभागाचे अधिकारी आणि पशुवैद्यकीय तज्ज्ञ घटनास्थळी त्वरीत दाखल झाल्याचंही सहाय यांनी सांगितलं. आसामचे वनमंत्री परिमल सुक्लबैद्य यांनी या १८ हत्तींच्या मृत्युबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर आपण स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी कऱणार असल्याचंही मंत्री परिमल यांनी सांगितलं. २०१७ सालच्या आकडेवारीनुसार, कर्नाटकनंतर आसाममध्ये हत्तींची संख्या सर्वाधिक आहे. आसाममधल्या हत्तींच्या संख्येत २००२ पासून मोठी वाढ झाली आहे. २००२मध्ये ५हजार २४६ हत्ती होते तर २०१७ मध्ये त्यांची संख्या ५हजार ७१९ झाली आहे. आसाममधले हत्तींना शिकार, रेल्वे अपघात, विषबाधा अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. २०१३ ते २०१७ या कालावधीत आसाममध्ये साधारण १०० हत्तींचा अनैसर्गिक मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.