देशात १९ एप्रिलच्या दिवशी लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडणार आहे. त्याआधी छत्तीसगडच्या कांकोरमध्ये सीआरपीएफचे जवान आणि नक्षली यांच्यात चकमक झाली. या चकमकीत १८ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. छोटे बेठीया ठाण्याच्या माड भागात ही चकमक सुरु आहे. यात आत्तापर्यंत १८ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तीन जवान जखमी झाले आहेत अशी माहिती समोर आली आहे. ANI ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

बस्तरचे आयजी पी. सुंदरराज यांनी काय म्हटलं आहे?

कांकोर येथे चकमक झाली आहे. आम्ही नक्षलवाद्यांच्या विरोधात जवानांनी मोहीम सुरु केली आहे. नक्षलवाद्यांच्या विरोधात जी कारवाई आम्ही केली त्यात आत्तापर्यंत १८ नक्षल्यांचा खात्मा केला आहे. मारल्या गेलेल्या १८ नक्षलवाद्यांमध्ये शेखर, ललिता आणि राजू या दीर्घकाळापासून नक्षलवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या नक्षल्यांचाही खात्मा करण्यात आला आहे. १८ नक्षलवाद्यांना ठार केल्यानंतर एके ४७, एसएलआर, 303 अशा बंदुका आणि दारुगोळाही जप्त करण्यात आला आहे. चकमक अद्यापही सुरु आहे. आमचे तीन जवान जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अशी माहिती सुंदरराज यांनी दिली.

CRPF ने दिलेल्या माहितीनुसार या चकमकीत नक्षलवाद्यांचा कमांडर शंकरही मारला गेला आहे. शंकरवर २५ लाखांचं इनाम होतं. या ठिकाणाहून पोलिसांनी २५ एके ४७ रायफल्स दोन एलएमजी आणि काही 303 बंदुका तसंच मोठ्या प्रमाणावर दारुगोळाही जप्त केला आहे.

१६ एप्रिलच्या दिवशी कांकोरमध्ये संयुक्त अभियान सुरु करण्यात आलं. पोलीस आणि सीआरपीएफचे जवान यात होते. कांकोरच्या बीनागुंडा गावात ही मोहीम राबवण्यात आली. त्यावेळी सुरु झालेल्या चकमकीत आत्तापर्यंत १८ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.