एपी, खार्तुम

सुदानची राजधानी खार्तुम आणि अन्य भागांत निमलष्करी दल आणि सैन्यादरम्यानच्या संघर्षांत एका भारतीयासह किमान ५६ जणांचा मृत्यू झाला. तर, ५९५ जण जखमी झाले. डॉक्टरांच्या एका संघटनेने याबाबतची माहिती रविवारी दिली.

या संघर्षांमुळे सुदानमध्ये लोकशाही सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नांना पुन्हा धक्का बसला. निमलष्करी दल (आरएसएफ) आणि सैन्यादरम्यानच्या एक महिन्याच्या तणावानंतर संघर्ष तीव्र झाला आहे. अब्देल फतेह अल बुरहान यांच्या नेतृत्वाखालील सैन्य दलाने एक निवेदन प्रसृत केले असून ‘आरएसएफ’ला बंडखोर म्हणून घोषित करतानाच चर्चा करण्यास नकार दिला. तसेच ‘आरएसएफ’च्या प्रमुखाला ‘गुन्हेगार’ म्हणून संबोधले. २०२१ मध्ये देशात सत्तांतर झाल्यानंतर दोन्ही दलांमध्ये संघर्ष होण्याचे संकेत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जनरल मोहम्मद हमदान दागलो यांच्या नेतृत्वाखालील ‘आरएसएफ’चे सशस्र दलांबरोबर एकीकरणाबाबत एकमत न झाल्याने तणाव निर्माण झाला होता. हिंसाचाराला शनिवारी सुरुवात झाली. खार्तुममध्ये अराजक परिस्थिती आहे. लढाऊ वाहनांमधून जोरदार गोळीबार सुरू आहे.सैन्यांनी शनिवारी संध्याकाळी प्रसृत केलेल्या निवेदनात उम्मदुरमन शहरातील ‘आरएसएफ’च्या सर्व तळांवर ताबा मिळवल्याचे नमूद केले आहे. तर, नागरिकांनी सांगितले की, राजधानीच्या परिसरात निमलष्करी दलाच्या चौक्यांवर हवाई हल्ले करण्यात आले आहेत.