Goa Temple : गोव्यातील शिरगावमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. शिरगाव येथील श्री लैराई देवीच्या यात्रे दरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीच्या घटनेत ६ भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती सांगितली जात आहे. तसेच १५ पेक्षा जास्त नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.

गोव्यातील शिरगाव या ठिकाणी शुक्रवारी रात्री उशिरा श्री लैराई देवीच्या यात्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी अचानक चेंगराचेंगरी झाली आणि मोठा गोंधळ उडाला. यामध्ये ६ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तसेच जखमींना गोवा येथील वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) आणि म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने एक्सवर (ट्विटर) दिलं आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील घटनेचा आढावा घेतला असून चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या भाविकांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे. दरम्यान, लैराई देवीची यात्रा हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. राज्यभरातून आणि परदेशातून देखील भाविक लैराई देवी च्या यात्रेसाठी येत असतात. या उत्सवात भव्य मिरवणूक काढली जाते. मात्र, या वर्षी या यात्रेदरम्यान चेंगराचेंगरीची दुर्देवी घटना घडली आणि या घटनेत ६ भाविकांचा मृत्यू झाला आहे.

गोवा काँग्रेसने काय म्हटलं?

“शिरगाव येथील श्री लैराई देवीच्या यात्रोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत आम्ही दुःख व्यक्त करतो. या घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं त्यांच्या कुटुंबियांप्रति आम्ही मनापासून संवेदना व्यक्त करतो. तसेच या घटनेत जखमी झालेले भाविक लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो”, असं गोवा काँग्रेसने एक्सवर (ट्विटर)केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

घटना कशामुळे घडली?

दरम्यान, शिरगाव येथील श्री लैराई देवीच्या यात्रोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत अद्याप स्थानिक प्रशासनाकडून अधिकृतपणे दुजोरा देण्यात आलेला नाही. तसेच चेंगराचेंगरीची घटना कशामुळे घडली? यामागचं कारण काय? याबाबत अद्याप कोणतीही माहिती प्रशासनाकडून अधिकृतपणे देण्यात आलेली नाही. मात्र, प्राथमिक माहितीनुसार अचानक मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत काय म्हणाले?

“शिरगाव येथील श्री लैराई देवीच्या यात्रोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला. मी जिल्हा रुग्णालयातही भेट दिली आहे. त्या ठिकाणी जखमींवर उपचार सुरु आहेत. ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. माहिती मिळताच मी घटनास्थळी गेलो. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंतप्रधान मोदींनी फोन करून या घटनेची चौकशी केली आहे. केंद्र सरकारकडून मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. तसेच पुढील ३ दिवसांसाठी आम्ही राज्यातील सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करत आहोत”, असं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे.