शाळेच्या बसला सोमवारी सकाळी आठ वाजता जालंधर-नाकोदर मार्गावर एका ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात बसमधील १२ मुले आणि बसचालक मृत्युमुखी पडला. तीन मुलांची प्रकृती चिंताजनक आहे.
अकाल अकादमी शाळेच्या या बसमधून ही मुले शाळेत जात असताना लांभारा जिल्ह्य़ातील जाहिरा गावालगत हा अपघात झाला. बसमध्ये आठ ते दहा या वयोगटातील २४ विद्यार्थी होते. अपघात होताच सात मुले घटनास्थळीच दगावली तर पाच मुले रुग्णालयात नेले जात असतानाच मृत्युमुखी पडली.
हा अपघात इतका भीषण होता की बसचे छप्पर पूर्ण फाटले असून ती चेचली गेली आहे. अपघातानंतर ट्रकचालक फरारी झाला असून त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांनी या अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर झाले असून जखमींवर मोफत उपचार केले जात आहेत.