विश्वचषकातील सुमार कामगिरीतून दक्षिण आफ्रिकेने धडा घेत भविष्यातील आव्हानांसाठी नव्या उमेदीने सुरुवात करावी, अशी प्रतिक्रिया वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाने व्यक्त केली.

सात सामन्यांत पाच पराभव पत्करलेला आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानी असून त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे व्यथित झालेला रबाडा म्हणाला, ‘‘यंदाच्या विश्वचषकात आम्ही खराब कामगिरी केली. काही सामन्यांत आम्ही दुर्दैवीसुद्धा ठरलो. परंतु या विश्वचषकाने आम्हाला भरपूर शिकवले, त्यामुळेच क्रिकेट हा विश्वातील सवरेत्कृष्ट खेळ आहे.’’

‘‘विश्वचषकाच्या पराभवातून सावरण्यासाठी माझ्यासह आणखी काही खेळाडूंना नक्कीच वेळ लागेल. मात्र आता आम्ही झाले ते विसरून नव्याने संघबांधणी करण्यावर भर देणार आहोत. २०२०च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने आतापासूनच सकारात्मक दृष्टिकोन बाळगून मेहनत घेण्याची गरज आहे,’’ असेही रबाडाने सांगितले.

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) व्यग्र कार्यक्रमाचा विश्वचषकाच्या तयारीवर परिणाम पडला का, असे विचारले असता रबाडा म्हणाला, ‘‘आयपीएलमुळे मला माझ्या गोलंदाजीवर मेहनत घेता आली. तिथे मी २५ बळी मिळवले. त्या तुलनेत विश्वचषकात मी साधारण कामगिरी केली. त्यामुळे ‘आयपीएल’ला विश्वचषकातील सुमार कामगिरीसाठी दोष देणे मूर्खपणाचे ठरेल.’’ रबाडाने आतापर्यंत विश्वचषकात फक्त सहा बळी घेतले असून आफ्रिकेच्या अजून श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढती शिल्लक आहेत.