अहमदाबाद : एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेनंतर राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि विमान अपघात तपास विभागाने (एएआयबी) शुक्रवारी अहमदाबादमधील अपघातस्थळाला भेट देऊन तपासाला सुरुवात केली असली तरी दिवसभरातील तपासातूनही काहीही उघड झाले नाही. त्यामुळे अपघात कसा झाला याचे गूढ कायम आहे. मात्र वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या छतावर दुर्घटनाग्रस्त विमानाच्या दोन ब्लॅक बॉक्सपैकी एक सापडला असून त्यामुळे तपासाला गती मिळण्याची चिन्हे आहेत.
विमानामध्ये दोन ब्लॅक बॉक्स असतात, त्यापैकी डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर (डीएफडीआर) एएआयबीच्या पथकाला सापडला असून कॉकपिट व्हाइस रेकॉर्डरचा (सीव्हीआर) शोध अजूनही सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. २४२ प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा बळी घेणाऱ्या या दुर्घटनेचे कारण निश्चित करण्यासाठी एक महत्त्वाचा पुरावा असलेल्या ब्लॅक बॉक्सचे विश्लेषण केले जाईल. ‘डीएफडीआर’द्वारे आपत्तीच्या आधीच्या घटनांबद्दल महत्त्वाची माहिती मिळण्याची अपेक्षा आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसरा ब्लॅक बॉक्स सापडल्यास तोही विमान अपघाताच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा ‘एएआयबी’च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
केंद्रीय विमान वाहतूक विभागानेही ब्लॅक बॉक्स सापडल्याचे जाहीर केले. ‘‘अपघातस्थळावरून ‘एएआयबी’ने २८ तासांच्या आत डीएफडीआर (ब्लॅक बॉक्स) जप्त केला आहे. हे तपासातील एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे घटनेच्या चौकशीला मोठी मदत होईल, असे विमान वाहतूकमंत्री के. राम मोहन नायडू यांनी सांगितले.
‘बोइंग ७८७ ड्रीमलाइनर’च्या ताफ्याची तपासणी
नवी दिल्ली : अहमदाबाद दुर्घटनेनंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) शुक्रवारी एअर इंडियाच्या जीएनएक्स इंजिनने चालवलेल्या ‘बोइंग ७८७ ड्रीमलाइनर’ ताफ्याची सुरक्षा तपासणी वाढवण्याचे आदेश दिले. डीजीसीएच्या वाढीव तपासणीमध्ये ड्रीमलाइनर विमानाच्या विविध प्रणालींची तपासणी आणि टेक-ऑफ पॅरामीटर्सचा आढावा समाविष्ट असेल. एअर इंडियाच्या ताफ्यात २६ ‘बोइंग ७८७-८’ आणि ७ ‘बोइंग ७८७-९’ आहेत. या विमानांवर तात्काळ अतिरिक्त देखभालीची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी संबंधित डीजीसीएच्या प्रादेशिक कार्यालयांशी समन्वय साधला जाणार आहे.
२४१ जणांच्या मृत्यूची पुष्टी
अहमदाबाद विमान दुर्घटनेत २४१ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी ‘एअर इंडिया’ने शुक्रवारी केली. या विमानात एकूण प्रवासी व कर्मचाऱ्यांची संख्या २४२ होती. त्यापैकी भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरिक असलेला प्रवासी बचावला असून अन्य प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे एअर इंडियाने गुरुवारी रात्री उशिरा जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, ओळख पटल्यानंतर सहा मृतांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. अनेक मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याने त्यांच्या डीएनए नमुन्यांची चाचणी करण्यासाठी ७२ हून अधिक तास लागतील, असे पोलिसांनी सांगितले. डीएनए चाचणी करण्यासाठी मृतांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती.
पंतप्रधानांकडून अपघातस्थळाची पाहणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी एअर इंडिया विमानाच्या अपघातस्थळाची पाहणी केली, त्याशिवाय सरकारी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. अपघातात बचावलेला विमानातील एकमेव प्रवासी विश्वासकुमार रमेश यांचीही भेट घेऊन पंतप्रधानांनी विचारपूस केली. त्यानंतर गुजरात सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर आढावा बैठक घेतली आणि अपघाताची संपूर्ण माहिती जाणून घेतली.