नेपाळमध्ये शुक्रवारी (२४ मार्च) एअर इंडिया आणि नेपाळ एअरलाइन्सची दोन विमानं हवेत धडकणार होती. पण नियंत्रण कक्षाने वेळीच वैमानिकांना सतर्क केल्याने मोठा अपघात टळला आहे. विमान प्रशासन अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती रविवारी (२६ मार्च) दिली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नेपाळ नागरी उड्डाण प्राधिकरणाने (CAAN) हवाई वाहतूक नियंत्रण विभागाच्या तीन कर्मचाऱ्यांना निष्काळजीपणाच्या आरोपावरून निलंबित केले आहे.

नेमकं काय घडलं?

CAAN चे प्रवक्ते जगन्नाथ निरुला यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी मलेशियातील क्वालालंपूरहून काठमांडूला येणारं नेपाळ एअरलाइन्सचं एअरबस ए-३२० हे विमान आणि नवी दिल्लीहून काठमांडूला येणारं एअर इंडियाचं विमान यांची हवेत टक्कर होणार होती. एअर इंडियाचं विमान १९ हजार फूट उंचीवरून खाली येत होते. त्याचवेळी नेपाळ एअरलाइन्सचं विमान १५ हजार फूट उंचीवरून उडत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही दोन्ही विमानं रडारवर जवळपास असल्याचं दिसताच नेपाळ एअरलाइन्सचं विमान सात हजार फूट उंचीवर खाली आणलं, यामुळे मोठी दुर्घटना टळली. याप्रकरणी नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. घटनेच्या वेळी नियंत्रण कक्षात तैनात असलेल्या तीन अधिकाऱ्यांना CAAN ने निलंबित केलं आहे. या घटनेबाबत एअर इंडियाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.