Air India Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश दिसत आहे. मृतांची ओळख पटविण्यासाठी कुटुंबातील सदस्यांची डीएनए चाचणी केली जात आहे. यासाठी जमलेले नातेवाईक आपला रोष व्यक्त करताना दिसत आहेत. मृतांच्या नातेवाईकांना टाटा समूहाकडून एक कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या मदतीवर काही नातेवाईकांनी आक्षेप घेतला आहे. आपल्या वडिलांच्या मृत्यूमुळे अतीव दुःख झालेल्या फाल्गुनी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आजे. ज्यात त्या टाटा ग्रुपला दोष देत आहेत.

मी २ कोटी देते, माझे वडील परत आणा

माध्यमांशी संवाद साधताना फाल्गुनी म्हणाल्या, “एक कोटी रुपये देऊन आमच्या जवळचा व्यक्ती परत येणार आहे का? मी टाटा ग्रुपला दोन कोटी देते, माझे वडील परत आणा. पैशांनी गेलेला माणूस परत येत नाही.” अहमदाबादच्या बीजे मेडीकल कॉलेज येथे रक्ताचे नमुने देण्यासाठी आल्या असताना फाल्गुनी यांनी माध्यमांशी संवाद साधला.

माझी आई आजारी आहे. एअर इंडिया, टाटा ग्रुपच्या आर्थिक मदतीमुळे माझे वडील परत येणार आहेत का? मला माझे वडील आणि त्यांचे प्रेम परत हवे आहे. माझे वडील नेहमी एअर इंडियाने प्रवास करण्याला प्राधान्य द्यायचे. एअर इंडिया माझ्या वडिलांना पुन्हा आणू शकते का? असा संतप्त सवाल फाल्गुनी यांनी उपस्थित केला.

शासकीय रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत २१९ जणांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. “मृतांच्या अनेक रक्ताचे नमुने दिले आहेत. काही विदेशी नागरिकांचे नमुने घेणे बाकी आहे. मानवी अवशेषांचे डीएनए विश्लेषणदेखील केले जात आहे. दोन्ही नमुन्यांची पडताळणी झाल्यानंतर ओळख पटविण्यास सुरुवात होईल आणि मृतदेह नातेवाईकांना सोपवले जातील”, असेही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विमान दुर्घटनेत २७४ जणांचा मृत्यू

एअर इंडिया विमान दुर्घटनेत एकूण २७४ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. विमानातील २४२ पैकी २४१ प्रवाशांचा स्फोटात मृत्यू झाला. तर विमान ज्याठिकाणी कोसळले, तेथे ३३ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.