देशात सध्या करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांची दैनंदिन संख्या तीन लाखाच्या आसपासच आहे. अशातच अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधांचीही कमतरता भासू लागली आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे सध्या सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही भाजपा सरकारवर टीका केली आहे.

त्यांनी याविषयीचं ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “करोनासंदर्भात भाजपा सरकार वारंवार खोटे आकडे सादर करत आहे. भाजपाला काय वाटतं की जनतेला आपल्या डोळ्यांसमोर होणाऱ्या मृत्युंचं सत्य दिसत नाही का? भाजपाच्या या खोटेपणाला कंटाळलेल्या समाजाने आँकडा ऐवजी आँखडा हा शब्द वापरायला हवा. कारण डोळ्याने जे पाहिलेलं असतं तेच खरं असतं.”

आणखी वाचा- दिल्लीतील रुग्णालयात करोनाचा विस्फोट; ८० डॉक्टर, कर्मचारी निघाले पॉझिटिव्ह

देशभरात करोना संसर्गाचा जोर अजूनही कायम असून, दररोज साडेतीन ते चार लाख रुग्णांची भर पडत आहे. रुग्णसंख्येच्या विस्फोटामुळे आरोग्य सुविधा कोलमडताना दिसत असून, वेळेत उपचार न मिळाल्याने, त्याचबरोबर ऑक्सिजन वा इतर सुविधांअभावी रुग्णांचे प्राण जात आहे. देशातील मृत्यूचा वेग अजूनही कायम असून, दररोज साडेतीन ते चार हजारांच्या सरासरीने मृत्यू होत आहे. त्यामुळे एकूण करोना बळींची संख्या अडीच लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.

आणखी वाचा- २० दिवसात १८ प्राध्यापकांचा करोनामुळे मृत्यू; अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या कुलगुरूंचं ICMR ला पत्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांतील आकेडवारी जाहीर केली आहे. गेल्या २४ तासांतील आकडेवारी मागील काही दिवसांतील आकडेवारीच्या तुलनेत दिलासा देणारी असली, तरी समाधानकारक नसल्याचं दिसत आहे. देशात रविवारी दिवसभरात तीन लाख ६६ हजार १६१ नवीन करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन लाख ५३ हजार ८१८ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.