महाराष्ट्रातील पालघर, भंडारा-गोंदिया तसेच उत्तर प्रदेशमधील कैराना लोकसभा आणि नूरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानावेळी अनेक ठिकाणी इव्हीएममध्ये बंद पडल्याच्या तक्रारी आल्या. यावरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी निशाणा साधला आहे. कडक उन्हामुळे इव्हीएममध्ये बिघाड झाल्याचे अधिकारी सांगत आहेत. अधिकाऱ्यांच्या या वक्तव्याचा अखिलेश यांनी समाचार घेतला आहे. आज उन्हामुळे इव्हीएम काम करत नसल्याचे सांगितले जात आहे. उद्या म्हणतील पावसामुळे आणि थंडीमुळे असे होत आहे. काही लोक जनतेला रांगेत उभा करून आपल्या सत्तेची ताकद दाखवू इच्छितात. मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची मागणी आम्ही पुन्हा करत आहेत, असे ट्विट करत अखिलेश यांनी भाजपावरही टीका केली आहे. इव्हीएम बिघाडामुळे अनेकांना मतदान करताना अडचणीचा सामना करावा लागला.

उष्म्यामुळे इव्हीएममध्ये बिघाड होत आहे. पण कुठेही इव्हीएममुळे निवडणूक प्रभावित होणार नाही. आमच्याकडे योग्य प्रमाणात अतिरिक्त यंत्रे आहेत. यंत्रात बिघाड ही तांत्रिक अडचण आहे. कडक उन्हामुळे व्हीव्हीपॅट खराब होत आहेत, असे मुख्य निवडणूक आयुक्त एल वेंकटेश्वर लू सोमवारी म्हणाले होते.

अखिलेश यांनी सलग तीन ट्विट करत निवडणूक आयोगाला इव्हीएममधील बिघाड दूर करण्याची मागणी केली. तसेच इव्हीएमच्या गोंधळानंतरही मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे अपील केले. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार कैरानामध्ये ५४ टक्के तर नूरपूर येथे ६१ टक्के मतदान झाले आहे. दोन्ही जागांची मतमोजणी ३१ मे रोजी होणार आहे.