पूँछ : पाकिस्तानने सीमेपलीकडून केलेल्या तोफांच्या माऱ्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी भेट घेतली. पाकिस्तानच्या हल्ल्यात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी लवकरच आर्थिक पॅकेजची घोषणा केली जाईल, असे ते म्हणाले. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर शहा यांनी जम्मू-काश्मीरला दिलेली ही पहिलीच भेट आहे.

जम्मू भागात शहा दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. शहा यांचे पूंछमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांनी गुरुद्वारा सिंग सभा येथे प्रथम भेट दिली. पाकिस्तानी तोफांच्या माऱ्यात या धार्मिक स्थळाचे नुकसान झाले होते. याखेरीज नुकसान झालेल्या इतर भागांनाही शहा यांनी भेट दिली आणि लोकांशी संवाद साधला. शहा यांनी या वेळी पाकिस्तानच्या तोफांच्या माऱ्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. शहा यांच्याबरोबर नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि दिल्लीचे मंत्री मजिंदर सिंह सिरसा उपस्थित होते.

बीएसएफचे कौतुक

गृहमंत्री शहा यांनी पाकिस्तानच्या आक्रमकतेला सडेतोड प्रत्युत्तर दिल्याबद्दल सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) कौतुक केले. जम्मू आघाडीवर पाकिस्तानच्या ११८ हून अधिक चौक्या उद्ध्वस्त झाल्याचे ते म्हणाले. ‘बीएसएफ’ने शत्रूच्या टेहळणीचे जाळे नष्ट केले. शत्रूचे असे नुकसान केले, की त्यांना परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी चार ते पाच वर्षांचा कालावधी लागेल. शांततेच्या काळातही तुम्ही जागरुक असता. प्रत्युत्तराने हे सिद्ध झाले, असे ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वातंत्र्यानंतर पूंछ भागात इतक्या मोठ्या प्रमाणावर तोफांचा मारा प्रथमच झाला. पाकिस्तानने नागरी वस्त्या, मंदिरे, गुरुद्वारा, मशिदींना लक्ष्य केले. हे कृत्य अतिशय निषेधार्ह आहे. पाकिस्तानच्या या माऱ्यानंतरच आपल्या सुरक्षा दलांनी अतिशय तीव्रतेने आणि अचूकपणे उत्तर दिले. – अमित शहा, गृहमंत्री