नवी दिल्ली : विकास, विरासत (हिंदुत्व) आणि गरीब कल्याण या त्रिसूत्रीला गुंफणारे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे ‘संकल्पपत्र’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी, आंबेडकर जयंतीदिनी सादर केले. या जाहीरनाम्याचे नाव ‘भाजप का संकल्प, मोदी की गॅरंटी’ असे ठेवण्यात आले असून त्यानिमित्ताने पक्षाने प्रचारातील घोषवाक्याचा पुनरुच्चार केला आहे.

भाजपच्या जाहीरनाम्यात समान नागरी कायदा आणि एक देश एक निवडणुकीची हमी देण्यात आली आहे. तसेच, ७० वर्षांवरील ज्येष्ठ तसेच तृतीयपंथीयांना आयुष्यमान योजना लागू करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा संकल्पपत्रात करण्यात आली आहे. घोटाळेबाजांना दयामाया न दाखवता तुरुंगात टाकणारी भ्रष्टाचाराविरोधी मोहीम यापुढेही चालू राहील, अशी हमी देत भाजपने विरोधकांना चपराक दिली आहे.  भाजप मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमात केंद्रात तिसऱ्यांदा पूर्ण बहुमतातील सरकार निवडून देण्याचे आवाहन मोदी यांनी जनतेला केले.

हेही वाचा >>>काँग्रेसची नवी यादी जाहीर; दिल्लीत कन्हैया कुमार विरुद्ध मनोज तिवारी लढत होणार

’मोफत धान्य योजनेला ५ वर्षांसाठी मुदतवाढ

’७० वर्षांवरील ज्येष्ठांना ५ लाखांचे मोफत उपचार

’गरिबांसाठी ३ कोटी घरे. घरोघरी पाइपद्वारे गॅसपुरवठा

’न्यायसंहिता तातडीने लागू करणार

’नागरिक दुरुस्ती कायदा (सीएए) लागू करणार

’भारताला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवणार

सामान्यांच्या जगण्याला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. त्यांच्या जगण्याचा दर्जा सुधारला पाहिजे. त्यासाठी विकासाच्या विविध आणि दर्जात्मक संधी मिळाल्या पाहिजेत. त्यादृष्टीने केंद्रातील भाजप सरकार कार्यरत राहील. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान