भारत-चीनचा गलवान खोऱ्यात संघर्ष झाला आणि यात चीनने भारतीय सैनिकांवर वेगवेगळ्या आधुनिक शस्त्रांचा वापर केला. यात तारांचं आवरण असलेल्या काठ्यांसह अनेक वस्तूंचा समावेश होता. अशी शस्त्र वापरण्यामागचा उद्देश थेट जीवघेणी शस्त्रं न वापरता अशा संघर्षात केवळ गंभीर जखमी करण्याचा असतो. आता भारताने देखील चीनच्या धूर्त युद्ध रणनीतीला जशास तसं उत्तर देण्यासाठी कंबर कसलीय.

नव्या शस्त्रास्त्र निर्मितीमुळे आता सीमेवरील भारतीय जवानांना शत्रूशी लढताना मोठी मदत होणार आहे. ही शस्त्रं इंद्राचं वज्र आणि शंकराचं त्रिशुळपासून प्रेरणा घेऊन बनवण्यात आलेत. त्यामुळे आधुनिक स्वरुपातीलया शस्त्रांना तिच नावं देण्यात आलीत. ते प्रभावीपणे चीनच्या शस्त्रांचा मुकाबला करू शकतील, अशी माहिती शस्त्र निर्मिती करणाऱ्या अपॅस्ट्रोन कंपनीने दिलीय.

“भारतातील पारंपारिक शस्त्रास्त्रांकडून प्रेरणा घेत आधुनिक वज्र आणि त्रिशुळ”

अपॅस्ट्रोन कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मोहित कुमार म्हणाले, “गलवान खोऱ्यात चीनच्या सैनिकांनी भारतीय जवानांवर तारांच्या काठ्या आणि टेसर्सचा वापर केला. यानंतर सुरक्षा दलांनी अशाप्रकारचे जीव घेणार नाही, मात्र शत्रूला चोख उत्तर देईल अशी शस्त्रं तयार करण्यास सांगितलं होतं. यानंतर भारतातील पारंपारिक शस्त्रास्त्रांकडून प्रेरणा घेऊन ही शस्त्रं तयार केली. ही शस्त्रास्त्र चीनच्या शस्त्रांपेक्षा कितीतरी अधिक घातक आहेत.”

हेही वाचा : भारतात घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकांना भारतीय लष्कराने घेतलं ताब्यात; २०० सैनिकांनी ओलांडलेली सीमा

“आम्ही वज्र नावाने खिळ्यांचा वापर करून धातूच्या काठी बनवल्या आहेत. याचा उपयोग शत्रूवर आक्रमक हल्ला करण्यासाठी होईल. त्यासोबतच शत्रू सैनिकांच्या बुलेट प्रुफ वाहनांचे टायर पंक्चर करण्यासाठी देखील होईल. या खिळ्यांचा बहुउपयोग होतो,” अशीही माहिती मोहित कुमार यांनी दिलीय.