नवी दिल्ली : ‘भविष्यात लष्कराला माहिती, तंत्रज्ञान आणि बुद्धिवंत योद्ध्यांची गरज असेल. तसेच, बदलत्या युद्धभूमीची व्यापकता लक्षात घेता भविष्यात जवानाला माहिती, तंत्रज्ञान आणि बुद्धिवंत योद्ध्यांचे एकत्रित ज्ञानाची गरज असेल,’ असे प्रतिपादन संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चौहान यांनी शुक्रवारी केले.
‘ऑपरेशन सिंदूर’ अद्यापही सुरू असून, लष्कराची युद्धसज्जता बाराही महिने २४ तास असण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले. ‘एअरोस्पेस पॉवर: प्रीझर्व्हिंग इंडियाज् सॉव्हर्निटी अँड फर्दरिंग नॅशनल इंटरेस्ट्स’ या विषयावर ‘सुब्रोतो पार्क’ येथे आयोजित सेमिनारमध्ये ते बोलत होते. ते म्हणाले, ‘युद्धात उपविजेते कुणी नसते. कुठल्याही लष्कराला कायम उच्च पातळीवरील युद्धसज्जता ठेवावीच लागते. याचे उदाहरण म्हणजे ऑपरेशन सिंदूर. ते आताही सुरूच आहे. आपली युद्धसज्जता उच्च पातळीची, बाराही महिने, २४ तास असायला हवी.’
‘पन्नासहून कमी शस्त्रांचा वापर करून शत्रूला चर्चेच्या व्यासपीठावर आणले’
नवी दिल्ली: ‘पन्नासहून कमी शस्त्रांचा वापर करून शत्रूला चर्चेच्या व्यासपीठावर आणता येणे शक्य आहे, हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने दाखवून दिले. या उपलब्धीचा अभ्यास करायला हवा,’ असे मत हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी यांनी शुक्रवारी व्यक्त केले. ‘सेंटर फॉर एअर पॉवर स्टडीज’ आणि ‘कॉलेज ऑफ एअर वॉरफेअर’ यांनी आयोजित केलेल्या सेमिनारमध्ये ते बोलत होते. ते म्हणाले, ‘ऑपरेशन सिंदूरपेक्षा दुसरे अधिक चांगले उदाहरण असू शकत नाही. ५०हून कमी शस्त्रांचा वापर करून शत्रूला चर्चेच्या व्यासपीठावर आणले. या उपलब्धीचा अभ्यास व्हायला हवा आणि तो होईल, याची खात्री आहे.’ मानवरहित आणि मानवासह युद्धांमध्ये मानवाचा सहभाग असलेली युद्धेच आणखी काही काळ तुलनेत फायद्याची ठरतील, असेही ते म्हणाले.