‘आदर्श’ घोटाळ्यात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे नावच आरोपींच्या यादीतून वगळण्याची मागणी करणारी त्यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आरोपींच्या यादीतून नाव वगळण्याची मागणी करणारी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केली.
चव्हाण यांच्यावर कारवाईची परवानगी देण्यास राज्यपालांनी नकार दिल्यानंतर कोलांटउडी मारत केंद्रीय अन्वेषण विभागाने चव्हाण यांचे नावच आरोपींच्या यादीतून वगळण्याची केलेली मागणी न्यायालयाने नोव्हेंबरमध्ये फेटाळली होती. मात्र, या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा या मागणीसाठी खुद्द चव्हाणांनीच न्यायालयात धाव घेतली होती. ती याचिकाही न्यायालयाने फेटाळली होती.
चव्हाण यांनी निर्णय रद्द करण्यासाठी केलेल्या याचिकेला सीबीआयतर्फेही पाठिंबा दर्शविण्यात आल्यावर न्यायालयाने स्वत:च्याच निर्णयाला स्थगिती दिली होती. तसेच घोटाळ्यातून चव्हाण यांचे नाव वगळायचे की नाही याबाबत नव्याने सुनावणी घेतली होती. याप्रकरणी युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती एम. एल. टहलियानी यांनी चव्हाण यांची याचिका फेटाळली होती. त्याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.