पीटीआय, चंडीगड
भारत-पाकिस्तान यांच्या लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागांत तणावाची परिस्थती कायम आहे. पाकिस्तानने शनिवारी सकाळी अनेक राज्यांत ड्रोनहल्ले, लांबपल्ल्यांचे शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्यांचे हल्ले केले. मात्र भारतीय लष्कराच्या हवाई दलाने ते उधळून लावले. पंजाबमध्ये अनेक ठिकाणी स्फोटांसारखे आवाज ऐकू आल्यानंतर बाजारपेठा, मॉल दिवसभर बंद करण्यात आले.
पाकिस्तानने शनिवारी सकाळी अमृतसर शहरात कामिकाझे ड्रोन सोडले. ‘बायकर यिहा-३’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ड्रोनना पहाटे ५ वाजताच्या सुमारास सोडण्यात आले आणि ते दाट लोकवस्ती असलेल्या नागरी भागांकडे जात होते. मात्र लष्कराच्या हवाई संरक्षण (एएडी) यंत्रणेने जलद प्रतिसाद दिला आणि भारतीय हवाई क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर काही सेकंदातच ड्रोन शोधून काढून नष्ट करण्यात आले.
सुरक्षा दलांनी पश्चिम आघाडीवर पाकिस्तानी ड्रोन, लांब पल्ल्याच्या शस्त्रास्त्रे आणि इतर दारूगोळ्यांचे हल्ले उधळून लावले. फगवाडा जिल्ह्यातील खल्यान आणि साहनी गावांमधील शेतात पहाटे एक अज्ञात वस्तू पडली आणि खड्डा पडला. या घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही.
अमृतसरमधील बियास, जालंधर, पठाणकोट आणि तरनतारन जिल्ह्यातील दुबली गावात अज्ञात अस्त्रांचे ढिगारे आढळले.
अधिकाऱ्यांनी जनतेला जमिनीवर पडलेल्या कोणत्याही अस्त्राच्या कोणत्याही भागाला स्पर्श करू नये आणि स्थानिक पोलिसांना त्याबद्दल माहिती देण्याचे आवाहन केले आहे. लष्करी संघर्षात तीव्र वाढ होत असताना होशियारपूर, अमृतसर आणि फिरोजपूरमध्ये शनिवारी सकाळी हवाई सायरन वाजले.
पठाणकोट, जालंधरमध्ये अतिदक्षता
पठाणकोट, जालंधर जिल्ह्यात शनिवारी सकाळी स्फोटांसारखे आवाज ऐकू आल्याने अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला. स्थानिक अधिकाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून शहरांतील बाजारपेठा, मॉल बंद करण्याचे आदेश दिले. पठाणकोट जिल्हा अधिकाऱ्यांनी २४ तास कार्यरत राहणारा नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. जालंधर जिल्ह्यातील कंगनीवाल गावातील निवासी भागात एका घरातील पाण्याच्या टाकीवर अज्ञात प्रक्षेपक पडला. या घटनेत एक जण जखमी झाला, तर परिसरातील घरांचेही नुकसान झाले. अज्ञात वस्तूचे काही भाग परिसरात पडले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कच्छमध्ये ड्रोनहल्ले उधळवले
गुजरातमधील कच्छमधील प्रशासनाने शनिवारी नागरिकांना घरातच राहण्याचे आणि अनावश्यकपणे बाहेर न पडण्याचे आवाहन करणारा सल्ला जारी केला. सशस्त्र दलांनी शुक्रवारी रात्री कच्छ येथे पाकिस्तानकडून केलेले ड्रोनहल्ले उधळून लावल्यानंतर आणि कच्छ आणि गुजरातमधील इतर दोन जिल्ह्यांमध्ये ब्लॅकआउट लागू केल्यानंतर हा सल्ला देण्यात आला.
‘दोन दिवसांपासून झोप नाही’
जयपूर : पाकिस्तानने शुक्रवारी रात्री राजस्थानच्या सीमाभागांत केलेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे स्थानिक रहिवासी चिंताग्रस्त आहेत. गेले दोन दिवस झोप नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. मात्र भारतीय सैन्याने हवेत ड्रोन नष्ट केल्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला असून पाकिस्तानकडून होणारे हल्ले आम्हाला इजा करणार नाहीत, असे जैसलमेरच्या रहिवाशांनी सांगितले. पश्चिम राजस्थानमध्ये संपूर्ण ब्लॅकआऊट झाला आणि रहिवाशांना सावध करण्यासाठी अनेक वेळा सायरन वाजवण्यात आले. शुक्रवारी रात्री जैसलमेरच्या पोखरणमध्ये पहिला ड्रोन हल्ला झाला. त्यानंतर जैसलमेर आणि बारमेरमधील इतर भागातूनही असेच प्रयत्न करण्यात आले. मात्र हवाई दलाने ड्रोन यशस्वीरीत्या निष्क्रिय केले.
हिमाचलमधील संशयास्पद वस्तू
हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील बेहाड गावात क्षेपणास्त्रासारखी संशयास्पद धातूची वस्तू आढळली, असे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. कांगडा जिल्ह्यातील नूरपूरच्या इंदोरा भागात दोन ठिकाणी ड्रोन आणि क्षेपणास्त्राच्या अवशेषांसारखी दिसणारी आणखी दोन संशयास्पद वस्तू देखील आढळल्या, असे त्यांनी सांगितले.