महाराष्ट्राच्या राज्यपालपदी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी याची नियुक्ती करण्यात आली आहे. सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही नियुक्ती केली आहे.
सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ 30 ऑगस्ट 2019 रोजी संपला. त्यांनी 30 ऑगस्ट 2014 रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली होती. त्यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच राज्यपालपदी कोण येणार याविषयी चर्चा सुरू झाली होती. यात माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची राज्यपालपदी वर्णी लागणार असल्याचे बोलले जात होते. पण, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगर सिंह कोश्यारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Kalraj Mishra, Governor of Himachal is transferred & appointed as Governor of Rajasthan. Bhagat Singh Koshyari appointed as Governor of Maharashtra, Bandaru Dattatreya as Governor of Himachal, Arif Mohammed Khan as Guv of Kerala, Tamilisai Soundararajan as Governor of Telangana pic.twitter.com/oKOe8xUOOz
— ANI (@ANI) September 1, 2019
भगत सिंह कोश्यारी यांचा जन्म 17 जून 1942 रोजी झाला आहे. उत्तराखंडमधील भाजपाचे सदस्य ते राष्ट्रीय उपाध्यक्ष असा त्यांचा पक्षातील प्रवास आहे. तसेच उत्तराखंडमधील भाजपाचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. 2001 ते 2002 मध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याचा कारभार केला होता. तसेच 2002 पासून 2007 पर्यंत उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. 2008 ते 2014 पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य म्हणून उत्तराखंडमधून निवडून गेले होते. भगत सिंह कोश्यारी यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेशी जवळीक आहे. 1977 मधील आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरूंगवासही भोगलेला आहे.
महाराष्ट्रासह राजस्थान, हिमाचल प्रदेश, केरळ आणि तेलंगाणाच्या राज्यपालपदाच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. कलराज मिश्रा यांना राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्त करण्यात आले आहेत. बंडारू दत्तात्रय हे हिमाचल प्रदेशचे नवे राज्यपाल आहेत. आरीफ मोहम्मद खान यांची केरळच्या, तर तमिलीसाई सौंदराजन यांची तेलंगणाच्या राज्यपालदी नियुक्ती करण्यात आली आहे.