बिहारमधील राजकीय भूकंपानंतर संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी भाजपच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा करून आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी नितीशकुमार आणि भाजपवर तोफ डागली आहे. तसेच त्यांनी बिहारच्या राज्यपालांवरही टीका केली. नितीशकुमारांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाला संधी दिली गेली नाही. भाजपचा लोकशाहीवर याआधी कधीच विश्वास नव्हता आणि आजही नाही. भाजपच्या या कृत्याचा धिक्कार करतो, अशा शब्दांत दिग्विजय यांनी संताप व्यक्त केला.

लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर नितीशकुमार यांनी राजदशी फारकत घेतली आणि काल मुख्यमंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यानंतर लगेच भाजपनं त्यांना पाठिंबा दर्शवला. नितीशकुमार यांनी काल रात्रीच भाजपच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा केला. आज त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली. बिहारमध्ये सत्ता समीकरण बदलले आहे. जेडीयूनं राजद आणि काँग्रेसशी आघाडी तोडून भाजपशी घरोबा केला आहे. बिहारमधील बदललेल्या सत्ता समीकरणानंतर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी भाजप, नितीशकुमार आणि बिहारच्या राज्यपालांवर ट्विटरवरून तोफ डागली आहे. बिहारचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्यावर त्यांनी टीका केली आहे. बिहारच्या राज्यपालांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालय आणि सरकारी आयोगाच्या आदेशांचं उल्लंघन केलं आहे, असं ट्विट त्यांनी केलं. दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या राजदला सत्ता स्थापनेची साधी संधीही दिली गेली नाही. भाजपचा लोकशाहीवर याआधीही विश्वास नव्हता आणि आताही नाही. त्यांच्या या कृत्याचा मी धिक्कार करतो, असेही ते म्हणाले.

बिहारच्या हितासाठी आणि विकासासाठी हा निर्णय घेतला आहे, असं नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सांगितलं. तर राज्याच्या विकासाला आमचं प्राधान्य असणार आहे. बिहारला एका नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नितीशकुमारांवर निशाणा साधला आहे. बिहारच्या जनतेनं जातीयवादाविरोधातील लढ्याच्या मुद्द्यावर त्यांना कौल दिला होता. पण आता त्यांनी स्वार्थासाठी भाजपशी हातमिळवणी केली आहे, अशी टीका गांधी यांनी केली.