पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेल्या तीन नव्या शेतकरी कायदांविरोधात गेले अनेक दिवस दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ विरोधी पक्षांनी एकत्र येत भारत बंद पाळला होता. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते गावोगावी फिरून भाजपाच्या चुकीच्या धोरणांबाबत सभा घेणार आहेत. तर शेतकऱ्यांसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज एक दिवसाचा उपवास करणार आहेत. संपूर्ण देशभरातून शेतकऱ्यांना पाठिंबा मिळत असताचा अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक आवाहन केलं आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, शेती विषयक कायदे आपण रद्द करा. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत तुम्ही स्वत: बसा. त्यांच्या नक्की काय समस्या आहेत ते जाणून घ्या. तळगाळातील लोकांचं तुमच्याबद्दल, सरकारबद्दल आणि एकंदर कायद्याबद्दल नक्की काय मत आहे हे समजून घ्या. आणि मुख्य म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वास जिंका”, असा सल्ला प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे. याच ट्विटमध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी सारे एकत्र येत असल्याचे म्हटले आहे. तसेच, शेतकरी आंदोलन, शेतीविषयक विधेयके हे दोन हॅशटॅगही त्यांनी वापरले आहेत.

दरम्यान, सत्ताधारी पक्षातील नेते मात्र या शेतकरी आंदोलनात राजकीय शक्तींचा हात असल्याचा आरोप सातत्याने करताना दिसत आहेत. काही सत्ताधारी नेत्यांनी तर या आंदोलनात शेतकऱ्यांमध्ये काही नक्षलवादी किंवा तत्सम लोक असल्याचाही आरोप केला आहे. काहींनी शेतकरी आंदोलन हे भारताबाहेरून आयोजित केलं जात असून यामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचेही म्हटले आहे. या सर्व विधानांवरून सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर प्रचंड टीका होताना दिसत आहे. शेतकऱ्यांमध्ये देशद्रोही दिसणाऱ्यांमध्ये गोडसे आणि सावरकरांचा डीएनए असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. तर, आंदोलकांमध्ये शेतकरी नसतील तर चर्चा कोणाशी आणि का करत आहात? असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे.