आपल्या जवानांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी सीमा सुरक्षा दलाच्या राजस्थानमधील बटालियनने नवा फंडा शोधून काढला आहे. गेल्या काही महिन्यांपासून जवानांच्या शारीरिक तंदुरुस्तीकडे विशेष लक्ष देणाऱ्या सीमा सुरक्षा दलाने या नव्या आकर्षक कल्पनेच्या माध्यमातून जवानांना प्रोत्साहित करण्याचे ठरविले आहे. शारीरीक तंदुरुस्त असलेल्या जवानांना त्यांना हव्या असलेल्या जागी बदली करून दिली जाणार आहे. त्याचबरोबर आपले वजन कमी करण्यात जे जवान यशस्वी होतील, त्यांना रोख बक्षिसांसह बढतीही देण्यात येईल, असे सीमा सुरक्षा दलाने म्हटले आहे.
सीमा सुरक्षा दलाच्या राजस्थानमधील बटालियनमध्ये जवानंच्या तंदुरुस्तीकडे विशेष लक्ष देण्यात येते. गेल्या काही महिन्यांमध्ये येथे काही जवानांचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर तंदुरुस्तीकडे जवानांनी अधिक लक्ष द्यावे, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचबरोबर ज्या जवानांचे वजन जास्त आहे. त्यांनाही वजन कमी करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येते आहे. त्यासाठीच वजन कमी करणाऱ्यांना रोख बक्षिसासह बढती देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. एका सर्वेक्षणानुसार, राजस्थान बटालियनमधील सहा टक्के जवानांचे वजन जास्त आहे.