उत्तर दिल्लीतील आदर्श नगरमध्ये राहणाऱ्या एका ४६ वर्षीय बिझनेसमॅनची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह सूटकेसमध्ये भरून, ती सूटकेस धावत्या राजधानी एक्स्प्रेसमधून गुजरातमध्ये फेकून देण्यात आली. अनैतिक संबंधातून ही हत्या झाली. महिलेच्या होणाऱ्या नवऱ्याने धावत्या ट्रेनमधून ती सूटकेस बाहेर फेकली अशी माहिती पोलिसांनी दिली.
नीरज गुप्ता असे मृत बिझनेसमॅनचे नाव आहे. त्याच्या डोक्यात आधी वीट घालण्यात आली. त्यानंतर त्याला तीन वेळा भोसकण्यात आले. कुठलाही प्रतिकार करण्याच्या स्थितीत नसलेल्या नीरजचा नंतर गळा चिरण्यात आला. उत्तर-पश्चिम दिल्लीचे पोलीस उपायुक्त विजयांता यांनी ही माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“नीरज गुप्ताचे ज्या महिलेसोबत संबंध होते, ती दुसऱ्या कोणाबरोबर ती विवाह करणार होती. बिझनेसमॅनला ते मान्य नव्हते, त्याने त्यावर आक्षेप घेतला होता. त्या वादातून ही हत्या झाली” असे डीसीपीने सांगितले. मृत नीरज गुप्ताची दिल्लीत करोल बागमध्ये एक वित्तीय कंपनी आहे. तो पत्नी आणि मुलांसोबत आदर्श नगरमध्ये रहायचा.

नीरज गुप्ता घरी परतला नाही, तेव्हा १४ नोव्हेंबरला त्याच्या एका मित्राने नीरज बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. “नीरज गुप्ताचे मागच्या दहा वर्षांपासन त्याच्याकडे काम करणाऱ्या एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते” असे त्याच्या पत्नीने सांगितल्याचे डीसीपी म्हणाले. पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर त्या महिलेला, तिचा होणारा नवरा जुबेरला (२८) अटक केली. त्यांच्या चौकशीतून या हत्येचा खुलासा झाला.

त्या महिलेचा अलीकडेच जुबेर बरोबर साखरपुडा झाला होता. नीरजला याबद्दल समजलं, तेव्हा त्याने तिला लग्न करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. “१३ नोव्हेंबरच्या रात्री नीरज त्या महिलेच्या आझादपूर येथील घरी गेला हाता. त्यावेळी तिच्या घरी मोठा वाद झाला. रागाच्या भरात नीरजने त्या महिलेला ढकललं. त्यावेळी तिथे उपस्थित असलेला जुबेर संतापला, त्याने नीरजच्या डोक्यात वीट घातली, त्यानंतर भोसकून त्याची हत्या केली” असे डीसीपीने सांगितले.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Businessman killed in delhi body thrown from rajdhani express in gujarat dmp
First published on: 19-11-2020 at 12:48 IST