पाकिस्तानी पत्रकार अरुसा आलम यांचे आयएसआय आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी असलेल्या कथित संबंधांची चर्चा सध्या पंजाबच्या राजकारणात जोरात सुरू आहे. पाकिस्तानी पत्रकार अरुसा यांच्या कथित आयएसआय संबधावरून कॅप्टन अमरिंदर सिंग यांना टीकेला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, पाकिस्तानी पत्रकार अरुसा आलम स्वत: पुढे येत त्यांनी आयएसआय आणि अमरिंदर सिंग यांच्यासोबत असलेल्या संबंधांवर स्पष्टीकरण दिले आहे. आज तकसोबत बोलताना अरुसा आलम यांनी अमरिंदर सिंग यांच्यासोबतचे कथित प्रेमप्रकरणाचे आरोप फेटाळून लावले आहेत. आम्ही फक्त चांगले मित्र आहेत पण प्रेमी नाहीत असे त्यांनी म्हटले आहे. “जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा ते ६६ वर्षांचे होते आणि मी ५६ वर्षांची होते. या वयात कोणीही प्रियकराच्या शोधात नाही. आम्ही अशा वेळी भेटलो जिथे प्रेम आणि रोमान्सला स्थान नाही. आम्ही चांगले मित्र आहोत, आम्ही सोलमेट आहोत, आम्ही प्रेमी नाही,” असे अरुसा आलम म्हणाल्या. त्याचवेळी, पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, पाकिस्तानी पत्रकार अरुसा आलम यांनी मंगळवारी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी कथित संबंध असल्याच्या आरोपांना अत्यंत अपमानास्पद आणि निराशाजनक म्हटले आहे. या आरोपांच्या भारतीय यंत्रणांच्या तपासात सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदरसिंग रंधावा यांनी गेल्या आठवड्यात अरुसा यांचा आयएसआयशी काही संबंध आहे की नाही याची चौकशी केली जाईल, असे म्हटले होते. “भारताच्या केंद्रीय यंत्रणांना या प्रकरणाची चौकशी करायची असल्यास मी सहकार्य करण्यास तयार आहे. माझ्याविरुद्धच्या निराधार आरोपांचा तपास करण्यासाठी भारत तिसऱ्या देशाच्या तपासकर्त्यांचीही मदत घेऊ शकतो. भारताच्या केंद्रीय यंत्रणांना या प्रकरणाची चौकशी करायची असेल तर मी सहकार्य करण्यास तयार आहे,” असे अरुसा यांनी सांगितले. "१६ वर्षांपूर्वी, जेव्हा मला काही कारणास्तव भारतीय व्हिसा नाकारण्यात आला तेव्हा भारत सरकारने चौकशी केली होती आणि नंतर व्हिसा देण्यात आला," असे त्या म्हणाल्या. अरुसा आलम नोव्हेंबरमध्ये शेवटच्या भारतात आल्या होत्या. पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या त्या अजूनही चांगल्या मैत्रीण आहेत. "या वादानंतरही कॅप्टन साहेब अजूनही माझे चांगले मित्र आहेत. हे आरोप अपमानजनक आणि अत्यंत निराशाजनक आहेत," असे आलम म्हणाल्या. महिला पत्रकाराचे आयएसआयशी संबंध आहेत की नाही याची चौकशी केली जाईल या रंधावा यांच्या वक्तव्यावर आलम यांनी टीका केली आहे. “माझे संबंध आयएसआयशी जोडण्याची कल्पना नवज्योतसिंग सिद्धू आणि मुख्य रणनीतीकार (मोहम्मद) मुस्तफा यांची होती. सिद्धू मुख्यमंत्री होण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरल्यानंतर त्यांना आयएसआयबद्दल बोलण्याचा सल्ला दिला असावा, असा आरोप अरुसा यांनी केला आहे.