ऋतुजा बागवे
माझे शिक्षण सैनिकी शाळेत झाल्याने त्या वातावरणात इतरांसारखी मजामस्ती करता आली नाही. परंतु क्रिकेट पाहण्यासाठी मात्र आमचा हट्ट असायचा आणि तेच एकमेव मनोरंजनाचे साधन असल्याने या खेळाशी वेगळे नाते निर्माण झाले. यंदाच्या विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामन्यादिवशी रविवार असूनदेखील आम्ही ‘अनन्या’चा प्रयोग केला नाही. त्या दिवशी सर्वानी मनसोक्त आनंद लुटला. भारताचा विजय झाला की, सगळ्यांनाच आनंद होतो. परंतु मी स्वत: खेळाडू असल्याने भारतीय संघाचा विजय होवो, वा पराजय माझ्या मनातील प्रत्येक खेळाडूविषयी असणारा आदर कधीच कमी होत नाही. अनेकदा माझे क्रिकेटविषयीचे ठोकताळे अचूक येतात. त्यामुळे मित्र-मैत्रिणी मिळून सामना पाहताना मला ‘आता सिक्स जाईल असे बोल.. आता विकेट पडेल असे बोल..’ असा आग्रह धरतात. क्रिकेटचे वेड कुणाला चुकले नाही. त्यामुळे नाटक असो वा चित्रीकरण तिथे सामन्याचे आकडे जाणून घेण्यात सर्वाचा पुढाकार असतो आणि यंदाचे सामने पाहता आपण पूर्ण तयारीने उतरलो आहोत, याची प्रचीती आली आहे. त्यामुळे यंदा विश्वचषक आपल्याकडे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
(शब्दांकन : निलेश अडसूळ)