वृत्तसंस्था, अमरावती

आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकीचाही निकाल जाहीर झाला. तेलुगू देसम पक्ष-भाजप-जनसेना पक्षाच्या आघाडीने विधानसभेतील सत्ताधारी वायएसआर काँग्रेसचा दणदणीत पराभव केला. तेलुगू देसम पक्षाने १६ तर भाजपने ३ जागा जिंकल्या. त्याशिवाय जनसेना पक्षाने २ जागांवर विजय मिळवला. या निकालामुळे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी तब्बल १० वर्षे राजकीय विजनवासात काढल्यानंतर रुबाबात पुनरागमन केले आहे.

आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेच्या एकूण २५ जागांपैकी २०१९ मध्ये वायएसआर काँग्रेसने राज्यातील २२ जागा जिंकल्या होत्या. तर तेलुगू देसम पक्षाला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले होते. तर काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नव्हती. यावेळी भाजप आणि चंद्राबाबू नायडू यांनी एकमेकांशी जुळवून घेत आघाडी केली. त्याचा त्यांना लोकसभेबरोबरच विधानसभेतही फायदा झाला. तर जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसला मोठा फटका बसला. भाजपला आदिलाबाद, करीमनगर आणि मलकाजगिरी या मतदारसंघांमध्ये यश मिळाले.

हेही वाचा >>>जुन्या मित्रांबरोबर लवकरच चर्चा; निकालानंतर राहुल गांधी यांची घोषणा, खरगे यांचा मोदींवर हल्लाबोल

रविवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ

आंध्र प्रदेश विधानसभेच्या १७५ जागांपैकी ‘टीडीपी’ने तब्बल १३४ मतदारसंघांमध्ये विजय मिळवला. जनसेना पक्षाने २१ तर भाजपने ८ जागा मिळवल्या. वायएसआर काँग्रेसला केवळ १२ जागांवर समाधान मानावे लागत आहे. चंद्राबाबू नायडू ९ जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे पक्षातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

जगन रेड्डी यांचा राजीनामा

विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसच्या पराभवानंतर मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी राज्यपाल एस अब्दुल नझीर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसची पडझड कायम

विशेष म्हणजे एकेकाळी या राज्यावर एकहाती सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेसला लोकसभा किंवा विधानसभेत एकही जागा मिळाली नाही. जगनमोहन रेड्डी यांच्या भगिनी आणि दिवंगत वाय एस राजशेखर रेड्डी यांची कन्या शर्मिला रेड्डी यांना हाताशी धरून काँग्रेसने किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला, पण त्यामध्ये त्यांना यश आले नाही. गेल्या वर्षाच्या अखेरीस तेलंगणा विधानसभेत मिळालेल्या यशाचा आंध्र प्रदेशातही परिणाम होईल अशी काँग्रेसला अपेक्षा होती. पण ती फलद्रूप झाली नाही.