देशभर चर्चा झालेल्या एअर इंडियाच्या मालकी हस्तांतरणाची प्रक्रिया संपल्यानंतर आता एअर इंडियामध्ये काय बदल होणार? याची उत्सुकता प्रत्येकालाच लागून राहिली आहे. २७ जानेवारी रोजी एअर इंडियाच्या मालकी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आणि एअर इंडिया पूर्णपणे टाटा सन्सच्या मालकीची झाली. या हस्तांतरणाच्या प्रक्रियेनंतर विस्तारा एअरलाईन्स या प्रसिद्ध विमान सेवा कंपनीचे माजी कार्यकारी अधिकारी संजीव कपूर यांनी एअर इंडियाने प्रवास केला. त्यांना जाणवलेल्या बदलांवर आणि मिळालेल्या सेवेवर आधारीत गुण त्यांनी दिले असून १० पैकी फक्त ५ गुण त्यांनी दिले आहेत. एअर इंडियाला १० पैकी ५ गुण! संजीव कपूर यांनी ३१ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. "एअर इंडियामध्ये हस्तांतरणानंतर कोणते बदल झाले, हे पाहण्यासाठी मी आज एअर इंडियाने प्रवास केला. वस्तूंमधला बदल होण्यासाठी वेळ लागतो, पण सॉफ्ट प्रोडक्ट्स आणि तुमची धारणा बदलण्यासाठी काही दिवस पुरेसे ठरतात. जेव्हा तसं करण्याची इच्छा आणि सर्वांचं एकमत असतं, तेव्हा ते सहज शक्य होतं", असं आपल्या ट्वीटमध्ये संजीव कपूर यांनी म्हटलं आहे. प्रायॉरिटी बोर्डिंग लेन! संजीव कपूर यांनी पहिला बदल पाहिला तो म्हणजे स्वतंत्र प्रायॉरिटी बोर्डिंग लेनचा. त्याविषयी संजीव कपूर म्हणतात, "मला आनंद आहे की एअर इंडियानं आता एक अतिरिक्त प्रायॉरिटी बोर्डिंग लेन तयार केली आहे". Budget 2022: एअर इंडियाचं थकित कर्ज फेडण्यासाठी बजेटमध्ये ५२ हजार कोटींची तरतूद! विमानाच्या आतील बदल! दरम्यान, सध्या ओबेरॉय हॉटेलचं अध्यक्षपद सांभाळत असलेल्या संजीव कपूर यांनी विमानाच्या आतील बदलांविषयी देखील आपल्या ट्वीटमध्ये उल्लेख केला आहे. "विमान आतल्या बाजूने स्वच्छ आणि सुस्थितीत होतं. कुठेही काहीही तुटल्याच्या खुणा नव्हत्या. पण माझ्या समोरच्या टीव्हीची स्क्रीन मात्र चालत नव्हती", असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. चहापानाला परवानगी नाही! विमानात इतर गोष्टी असल्या, तरी इकोनॉमी क्लासमध्ये चहा-पान मात्र दिलं जात नसल्याचं संजीव कपूर यांनी नमूद केलं. "डीजीसीएच्या कोविड नियमावलीमुळे हे चहापान बंद असल्याचं सांगितलं गेलं. पण इतर विमान सेवा मात्र ते देत आहेत", असं कपूर यांनी नमूद केलं आहे. "विमानातील स्टाफने पीपीई किट घातले होते, तर त्यांच्या पीपीई किटवर नावं लिहिली होती. स्टँडर्ड एअर इडिया सर्व्हिस दिली जात होती", असंही त्यांनी म्हटलं आहे. लाईट बंद, सीट-बेल्टचा नियम नाही! दरम्यान, उड्डाणानंतर काही वेळाने बंद झालेली लाईट विमान लँड होईपर्यंत बंदच होती, असं कपूर यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. "सीट बेल्ट वगैरेचे निर्बंधही नव्हते. अंधारात सीटबेल्ट लावणं वगैरे जमलंही नसतं म्हणा! जेवणानंतर प्रवाशांनी तोंडावरचा मास्क काढला तो लावलाच नाही. विमानातील स्टाफने देखील प्रवाशांना तो लावण्याचा आग्रह केला नाही", असं कपूर यांनी सांगितलं आहे. लोकसत्ता विश्लेषण : टाटा एव्हिएशन ते एअर इंडिया! ७० वर्षांपूर्वी सरकारनं कसा मिळवला होता टाटांच्या विमान कंपनीवर ताबा सोशल डिस्टन्सिंगचा पत्ता नाही! "विमानावर कुणीही सोशल डिस्टन्सिंग पाळत नव्हतं. प्रवासी उतरताना त्यासंदर्भात कोणतीही अनाऊन्समेंट केली जात नव्हती किंवा प्रवाशांना सांगितलं जात नव्हतं. डिसेंबरमध्ये मी एअर इंडियानं प्रवास केला तेव्हा हे सक्तीनं सांगितलं जात होतं. आता मात्र तसं काहीही नव्हतं", असं कपूर म्हणाले. "जेव्हा वैमानिकानं उड्डाणादरम्यान प्रवाशांचं स्वागत करण्यासाठी अनाऊन्समेंट केली, तेव्हाच फक्त नव्या मालकांचा उल्लेख झाला. त्यामुळे एकंदरीत एअर इंडियाला मी १० पैकी ५ गुण देईन", असं कपूर यांनी नमूद केलं आहे.