काही लोक गेल्या ७० वर्षांतील देशाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत हे दुर्दैवी आहे, असे म्हणत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी भाजपावर हल्ला चढवला आहे. ज्यांना आपल्या पूर्वजांच्या कृतीचा अभिमान वाटत नाही त्यांनी त्यांचा अपमान करू नये, असे ही भूपेश बघेल यांनी म्हटले आहे. रायपूर येथे प्रसिद्ध पत्रकार आणि लेखक रशीद किडवई यांच्या 'इंडियाज प्राइम मिनिस्टर - देश, दशा आणि दिशा' या पुस्तकाच्या लोकार्पण कार्यक्रमात बघेल यांनी देश स्वतंत्र झाला तेव्हा एक सुईसुद्धा तयार होत नव्हती आणि आज ७० वर्षांत या सरकारांनी काय केले जाते असे म्हटले. “देश स्वतंत्र झाला, त्यावेळी काहीही नव्हते. आजची पिढी मागच्या पिढीला विचारते, त्यांनी काय केले? त्यांच्या सेवा, परिश्रम, त्याग आणि तपश्चर्येवर प्रश्न उपस्थित केले जात आहे ते फार दुर्दैवी आहेत,” असे मुख्यमंत्री बघेल म्हणाले. "जर आपण आपल्या पूर्वजांच्या, वडिलांच्या कृतीचा अभिमान बाळगू शकत नसाल तर या पिढीला त्यांचा अपमान करण्याचा अधिकार नाही. जे फक्त इतिहासात जगत आहेत त्यांनी इतिहासाच्या चुकांमधून शिकले पाहिजे. यातून धडा घ्या आणि पुढे जा. इतिहासाला कात्री लावून काही मिळत नाही," बघेल यांनी म्हटले. "भारताचे जितके पंतप्रधान झाले त्यांच्याबद्दल प्रसारमाध्यमांमधून किंवा इतर माध्यमांतून जेवढी माहिती मिळते तेवढीच सर्वसामान्यांना माहिती असते. पण, पत्रकार या पंतप्रधानांच्या जवळचे असतात, त्यामुळे त्यांच्याकडेही अशी माहिती असते जी सहसा उघड होत नाही. अशा परिस्थितीत एका पत्रकाराने पंतप्रधानांच्या संदर्भात लिहिलेल्या पुस्तकातून तुम्हाला नवीन काही कळेल," असे मुख्यमंत्र्यांनी या पुस्तकाबाबत सांगितले. मुख्यमंत्री बघेल यांनी आपल्या भाषणात देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, गुलजारी लाल नंदा, लाल बहादूर शास्त्री, चंद्रशेखर आणि चौधरी चरणसिंग यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्याचा विशेष उल्लेख केला. पत्रकार आणि राजकीय विश्लेषक किडवाई यांचे हिंदी भाषेत लिहिलेले हे पहिले पुस्तक आहे. याआधी त्यांची अनेक पुस्तके इंग्रजी भाषेत प्रकाशित झाली आहेत. किडवई यांनी त्यांच्या 'भारताचे पंतप्रधान - देश, दशा, दिशा' या पुस्तकात पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ते विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचे आणि कार्याचे मूल्यमापन केले आहे.