काँग्रेस पक्षाला गेल्या काही दिवसांपासून गळती लागलेली दिसत आहे. मागच्या महिन्याभरात महाराष्ट्रातील तीन ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी मोठं विधान केलं आहे. डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी (DPAP) पक्षाचे अध्यक्ष गुलाम नबी आझाद यांनी बुधवारी म्हटलं की, काँग्रेसमधील काही लोकांची अकार्यक्षमता आणि अहंकारामुळे दुर्दैवाने काँग्रेस पक्ष संपण्याच्या मार्गावर आहे. १३ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर बुधवारी (१४ फेब्रुवारी) एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना गुलाम नबी आझाद यांनी हा दावा केला. गुलाम नबी आझाद पुढे म्हणाले, "मी आता काँग्रेस पक्षात नाही, त्यामुळे या मुद्द्यावर मी अधिक बोलू इच्छित नाही. ते आणि त्यांचा पक्ष यांच्याशी माझा संबंध नाही. पण अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षासाठी मोठं योगदान दिलं होतं. त्यांचे वडिलही काँग्रेसचे मोठे नेते होते. तेही माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री होते. मला मिळालेल्या माहितीनुसार नजीकच्या काळात आणखी काही नेते काँग्रेसमधून बाहेर पडणार आहेत. काँग्रेससाठी हा मोठा धक्का असेल." माझी संसदीय कारकिर्द महाराष्ट्रातून सुरू झाली होती. तसेच मी महाराष्ट्रातून लोकसभेसाठीही उभा राहिलो होतो. मी पहिल्यांदा महाराष्ट्रातूनच राज्यसभेवर गेलो होतो. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, जे काँग्रेसला पुन्हा एकदा तारू शकते. इतर राज्य जसे की, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या राज्यातून काँग्रेस जवळपास संपुष्टात आली आहे. केवळ काही लोकांची अकार्यक्षमता आणि अहंकारामुळे पक्षाचा ऱ्हास होत आहे, ही दुर्दैवी बाब असल्याचेही गुलाम नबी आझाद यांनी म्हटले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी १३ फेब्रुवारी रोजी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांच्यासह विधानसपरिषदेचे माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनीही भाजपात प्रवेश केला. तर दुसऱ्याच दिवशी अशोक चव्हाण यांना भाजपाकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. काँग्रेसमधून बाहेर पडताना अशोक चव्हाण यांनी कुणावरही आरोप केले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकून मुख्य राष्ट्रीय प्रवाहात काम करण्याची इच्छा असल्यामुळे भाजपामध्ये प्रवेश केला असल्याचे ते म्हटले. तत्पूर्वी १० फेब्रुवारी रोजी काँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात प्रवेश केला. त्याआधी १४ जानेवारी रोजी माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनीही काँग्रेसमधून बाहेर पडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. आगामी काळात आणखी काही काँग्रेसचे नेते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.