आयएनएक्स मीडिया प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांची बाजू न्यायालयात मांडणारे वकील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी आपले सहकारी काँग्रेस नेते जयराम रमेश यांचं समर्थन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वारंवार खलनायक म्हणून सादर करणं चुकीचं आहे, आणि असं करुन विरोधी पक्ष एकाप्रकारे त्यांची मदत करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
सिंघवी यांनी जयराम रमेश यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत ट्विट करत म्हटलं आहे की, “नरेंद्र मोदींनी खलनायक म्हणून सादर करणं चुकीचं असल्याचं मी नेहमची म्हटलं आहे. फक्त ते देशाचे पंतप्रधान आहेत म्हणून नाही, तर असं केल्याने विरोधी पक्ष त्यांची मदत करत आहे”.
Always said demonising #Modi wrong. No only is he #PM of nation, a one way opposition actually helps him. Acts are always good, bad & indifferent—they must be judged issue wise and nt person wise. Certainly, #ujjawala scheme is only one amongst other good deeds. #Jairamramesh
— Abhishek Singhvi (@DrAMSinghvi) August 23, 2019
पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “एखादं कृत्य हे चांगलं, वाईट किंवा वेगळं असतं. पण कामाचं मूल्यांकन हे मुद्द्यांवर संबंधित व्यक्तीच्या नाही तर मुद्द्यांच्या आधारावर झालं पाहिजे. ज्याप्रमाणे उज्ज्वला योजना चांगल्या कामांपैकी एक आहे”. यावेळी त्यांनी जयराम रमेश यांना टॅगदेखील केलं आहे.
काय म्हणाले होते जयराम रमेश ?
काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी काँग्रेसलाच घरचा आहेर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सतत खलनायकाच्या भूमिकेत ठेऊन त्यांच्या कार्यपद्धतीवर टिका करत त्यांचं चांगलं काम न स्वीकारल्याचा काहीच उपयोग होणार नाही असं मत रमेश यांनी व्यक्त केले आहे. मोदींनी २०१४ ते २०१९ मध्ये जे काम केले त्याचे महत्व समजून घ्यायला हवे. याच कामाच्या जोरावर ते पुन्हा सत्तेत आले आहेत. त्यांचे हेच काम पाहून ३० टक्क्यांहून अधिक मतदरांनी त्यांना पुन्हा सत्तेत बसवलं असल्याचे रामेश यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला ३७.४ टक्के मते मिळाली असून भाजपा आणि मित्रपक्षाला एकूण ४५ टक्के मते मिळाली आहेत यावरुन रमेश यांनी काँग्रेसलाच ऐकवले आहे.
एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना जयराम रमेश यांनी सांगितलं की, “नरेंद्र मोदींनी २०१४ ते २०१९ दरम्यान केलेल्या कामाचं महत्त्व आपण समजून घेतलं पाहिजे. ज्यामुळे ते पुन्हा सत्तेत आले आहेत. यामुळेच देशातील ३० टक्के मतदारांना पुन्हा एकदा त्यांच्या हाती सत्तेची चावी दिली आहे”.