सॅम पित्रोडा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन गदारोळ सुरु असताना काँग्रेस पक्षाने पत्रक जारी करत हे त्यांचं वैयक्तित मत असून पक्षाशी त्यांचं काही देणं घेणं नाही असं सांगत फारकत घेतली आहे. सॅम पित्रोडा यांनी १९८४ च्या दंगलीचं काय घेऊन बसलात? ती दंगल तर घडून गेली, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या पाच वर्षात काय केलं हे देशाला सांगावं असं वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला होता. यावरुन सॅम पित्रोडा यांच्यावर टीका होत असून काँग्रेसने आता आपला या वक्तव्याशी काही संबंध नसल्याचं सांगितलं आहे.
‘१९८४ दंगलीतील पीडितांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आमचा पाठिंबा कायम आहे. याविरोधात सॅम पित्रोडा अथवा कोणीही व्यक्त केलेलं मत किंवा वक्तव्य हे काँग्रेस पक्षाचं मत नाही’, असं काँग्रेसने पत्रकात सांगितलं आहे. यावेळी काँग्रेसने पत्रकात २००२ गुजरात दंगलीचाही उल्लेख केला आहे.
‘१९८४ दंगल पीडितांना आणि २००२ गुजरात दंगल पीडितांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. कोणत्याही प्रकारच्या, कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेविरोधात त्यांच्या धर्म, रंगाच्या आधारे करण्यात आलेल्या हिंसाचाराला आमचा विरोध आहे’, असं काँग्रेसने म्हटलं आहे.
Congress: We believe that justice should be done to 1984 riots victims as also to 2002 Gujarat riots victims. We abhor violence of any kind, against any person or a group of people based on their caste, colour, region or religion. This is the essence of India. https://t.co/6GAfjnEqS7
— ANI (@ANI) May 10, 2019
काय म्हणाले होते सॅम पित्रोडा –
१९८४ च्या दंगलीचे आदेश त्यावेळी पंतप्रधान कार्यालयाकडून आले होते असा आरोप भाजपाने केला आहे. यावर प्रतिक्रिया मागितली असता सॅम पित्रोडा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. १९८४ च्या दंगलीचे काय घेऊन बसलात? १९८४ च्या दंगलीत पंतप्रधान कार्यालयाकडून काही आदेश देण्यात आले होते हे मला अजिबात वाटत नाही. १९८४ ची दंगल घडून गेली. त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आता का बोलत आहेत? मागील पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय केलं? हे देशाला सांगावं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं खोटं बोल पण रेटून बोल हे धोरण आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये झालेल्या सभेत १९८४ मध्ये झालेल्या दंगलीसंदर्भात काँग्रेसवर टीका केली होती. भाजपाने या दंगलीत जे दोषी होते त्यांना शिक्षा देण्यास सुरूवात केली आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. १९८४ च्या दंगलीत एक काँग्रेसचा एक नेता सहभागी होता. त्याला शिक्षा देण्याऐवजी काँग्रेसने मुख्यमंत्रीपद दिलं अशीही टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. कमलनाथ यांच्यावर याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाने आरोप केले आहेत मात्र हे सगळे आरोप कमलनाथ यांनी फेटाळले आहेत.
दरम्यान याच टीकेबाबत आणि १९८४ बाबत सॅम पित्रोडा यांना विचारले असता, पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त खोटं बोलत असल्याची टीका त्यांनी केली. १९८४ च्या दंगलीचा संदर्भ पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपल्या भाषणांमधून का देत आहेत? असाही प्रश्न सॅम पित्रोडा यांनी विचारला. दरम्यान १९८४ सोडून द्या ती दंगल घडून गेली या वक्तव्यावरूनही भाजपाने सॅम पित्रोडांवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. भाजपाच्या अधिकृत ट्विटर पेजवर सॅम पित्रोडांवर निशाणा साधण्यात आला आहे.