जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरण खोऱ्यात २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी जिल्यात २५ पर्यटक आणि एका स्थानिकाची हत्या करण्यात आली. या हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वीच श्रीनगर आणि आसपासच्या हॉटेलमध्ये राहणाऱ्या पर्यटकांवर हल्ला होण्याची आगाऊ माहिती गुप्तचर यंत्रणांनी सरकारकडे दिली होते, अशी माहिती आता समोर येत आहे. गुप्तचर यंत्रणांशी संबंधित असलेल्या एका अधिकाऱ्याने सदर माहिती आहे.
सदर गुप्तवार्ता प्राप्त झाल्यानंतर श्रीनगर आणि परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती. श्रीनगरमधील दल सरोवर, मुघल गार्डन, दाचिगम राष्ट्रीय उद्यान आणि झबरवान पर्वतरांगांच्या पायथ्याशी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती, असे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
पोलीस महासंचालक आणि इतर काही पोलीस अधिकाऱ्यांनी हल्ल्याच्या काही दिवस आधीपासून श्रीनगर खोऱ्यात तळ ठोकला होता, अशीही माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न उघड करण्याच्या अटीवर सांगितली. “त्यांना (सुरक्षा यंत्रणा आणि जम्मू-काश्मीर पोलीस) हल्ल्याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यांना हल्ल्याची अपेक्षा होती. श्रीनगरमध्ये हल्ला होईल, असे त्यांना वाटले. कारण याआधी दक्षिण काश्मीरमध्ये नागरिकांच्या हत्या करण्यात आल्या आहेत”, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. पहलगाम हल्ल्याच्या १० ते १५ दिवस आधी दाचिगाम, निशात आणि लगतच्या परिसरात शोध मोहीम राबविण्यात आली होती.
शोध मोहीम राबवूनही त्यात फारसे यश मिळाले नाही, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. तथापि, जम्मू-काश्मीरच्या पोलीस दलातील एका सूत्राने सांगितले की, गुप्तचर विभागाची माहिती विशिष्ट अशी नव्हती. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर हल्ल्याचे ठिकाण समजून आले. तसेच ओळख न उघ करण्याच्या आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, पहलगाममध्ये हल्ला करणारे चार दहशतवादी होते. त्यापैकी दोघे खोऱ्यातीलच होते. याची सुरक्षा यंत्रणांना आता खात्री झाली आहे.
अटारी सीमेवरून पाकिस्तानात जाणाऱ्या काश्मिरींच्या माहितीशी संशयितांची ओळख जुळल्यानंरत यातील सत्य बाहेर आले. दक्षिण काश्मीरमधील दोन तरूण अटारी सीमेवरून पाकिस्तानात गेले होते. परंतु पाकिस्तानमधून पुन्हा भारतात आल्याची त्यांची नोंद नाही. ते जम्मूमधील कठूआमधील सीमेतून पुन्हा भारतात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, दोन स्थानिक अतिरेक्यांनी पर्यटकांमध्ये मिसळून त्यांना फूड कोर्ट कॉम्पलेक्समध्ये गोळा केले. त्यानंतर पाकिस्तानी असलेल्या दोन संशयित अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. “अतिरेकी चार ते पाच दिवसांपासून बैसरणच्या खोऱ्यात होते. परिसरातील काही स्थानिक लोकांच्या पाठिंब्याशिवाय हे घडू शकले नसते”, असाही संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.