पीटीआय, इम्फाळ : मणिपूरमध्ये जुलै महिन्यापासून बेपत्ता असलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मृतदेहांची छायाचित्रे सोमवारी समाजमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या विद्यार्थ्यांचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. बेपत्ता विद्यार्थ्यांची दोन छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाली. एका छायाचित्रात त्यांच्याबरोबर दोन सशस्त्र व्यक्ती दिसत आहेत, तर अन्य एका छायाचित्रात त्यांचे मृतदेह आहेत. त्यानंतर काही तासांमध्येच राज्य सरकारने लोकांना संयम राखण्याचे आणि अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांचे अपहरण आणि हत्येचा तपास करू देण्याचे आवाहन केले. तसेच कोणताही अनुचित प्रसंग उद्भवू नये यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी सोमवारी रात्री यासंबंधी निवेदन प्रसृत केले. या प्रकरणाचा तपास आधीच सीबीआयकडे सोपवण्यात आल्याचे त्यामध्ये सांगण्यात आले आहे. फिजम हेमजित (२०) आणि हिजाम लिन्थोइनगाम्बी (१७) अशी या मृत विद्यार्थाची नावे असून ते ६ जुलैपासून बेपत्ता होते. त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी शोध मोहीम हाती घेतल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

प्रियंका गांधींची केंद्र सरकारवर टीका

केंद्र सरकारला आपल्या निष्क्रियतेची शरम वाटायला पाहिजे, अशी टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केली. मणिपूरमध्ये भयंकर गुन्हे घडू दिले जात आहेत आणि केंद्र सरकार मात्र निष्क्रिय आहे, अशी टीका त्यांनी एक्स या समाजमाध्यमाद्वारे केली. वांशिक हिंसेमध्ये मुले सर्वाधिक असुरक्षित असतात, त्यांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे असे त्यांनी लिहिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांचा लाठीमार

बेपत्ता विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ मंगळवारी इम्फाळ खोऱ्यात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला तसेच अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. त्यामध्ये ३०पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाले. जखमींमध्ये मुलींची संख्या जास्त आहे. विद्यार्थी मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयाकडे जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी लाठीमार केला.