राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. सोमवारी चार असलेला मृतांचा आकडा शुक्रवारी ४२वर पोहोचला आहे. अजूनही जखमींवर उपचार सुरू आहेत. तर हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांमध्ये प्रचंड फेरबदल करण्यात आले आहेत. दरम्यान, या हिंसाचारादरम्यान अंगावर शहारा आणणाऱ्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. या हिंसाचारात दोन मुलींसह पहिल्या मजल्यावरून जीव वाचवून पळालेल्या महिलेनं आपली आपबीती सांगितली.

सोमवारी ईशान्य दिल्लीत सीएए विरोधक आणि समर्थक यांच्यात यांच्यात तुफानी दगडफेक झाली. यावेळी दोन्ही गटातील जमावानं घरं, दुकानं, वाहनं यांना लक्ष्य करत जाळपोळ केली. तसेच नागरिकांवरही हल्ले केले. यात अनेकांना जीव गमवावा लागला. जाफराबाद, यमुना विहार, बाबरपूर, खजुरी खास या भागात झालेल्या हिंसाचारातील अनेक कहाण्या आता समोर येऊ लागल्या आहेत. य

उत्तर पूर्व दिल्लीतल्या अल हिंद रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ४५ वर्षीय महिलेनं हिंसाचारादरम्यान घडलेली घटना सांगितली. “हिंसक घटना घडत असताना मी घरीच होते. अचानक जाळपोळ करणारा जमाव घरात घुसला. जमावानं मला आणि माझ्या मुलींना छेडायला सुरूवात केली. त्यानी कपडेही फाडले. त्यामुळे मी आणि मुलींनी पहिल्या मजल्यावरून उड्या मारून जीव वाचवला. उड्या मारल्यानंतरही जमाव आमच्यामागे लागला होता. पण, मी एक जवळच असलेल्या दुकानदाराकडे मदत मागितली. दुकानदार अयुब अहमद यांनी आमची मदत केली. त्यांनी आम्हाला जेवायला दिलं. गरजेच्या वस्तू दिल्या. तसेच त्यानंतर रुग्णालयातही दाखल केलं. मी छेड काढणाऱ्यांना ओळखू शकते, कारण ते सगळे आमच्याच गल्लीत राहणारे आहेत,” असं सांगताना ४५ वर्षीय महिलेला गहिवरून आलं.