केंद्र आणि उत्तरप्रदेशातलं भारतीय जनता पार्टीचं सरकार दोन इंजिनांसारखं आहे, त्यामुळे ते दुप्पट वेगानं विकासकामं करत आहे, असं प्रतिपादन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते म्हणले, जेव्हा शुद्ध हेतूने काम केलं जातं, त्यावेळी संकटंही आपल्याला अडवू शकत नाहीत. उत्तरप्रदेशातल्या गोरखपूरमध्ये एका उद्घाटन कार्यक्रमात मोदी बोलत होते.

मोदी म्हणाले, “मी पाच वर्षांपूर्वी एम्स रुग्णालय आणि खतांच्या कारखान्याच्या पायाभरणी समारंभासाठी आलो होतो. या दोन्ही गोष्टींचं उद्घाटन करण्याचं भाग्य मला आज मिळालं. आयसीएमआरच्या रिजनल मेडिकल रिसर्च सेंटरला नवी इमारतही आज मिळाली आहे. मी उत्तरप्रदेशच्या नागरिकांचं अभिनंदन करतो”.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “दोन इंजिनचे सरकार असताना काम दुप्पट वेगाने होते. जेव्हा काम चांगल्या हेतूने केले जाते, त्यावेळी संकटंसुद्धा आपल्याला अडवू शकत नाहीत. जेव्हा गोरगरीब, वंचित, शोषितांची काळजी करणार सरकार असतं, तेव्हा ते देखील जोमाने काम करतात, त्या सरकारला पुन्हा निवडून आणतात”.

उत्तरप्रदेशातल्या गोरखपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ९,६०० कोटींहून अधिक खर्चाच्या विकासकामांचं उद्घाटन केलं. यावेळी राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी गोरखपूरमधल्या विकास प्रकल्पांच्या प्रदर्शनाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी गोरखपूर फर्टिलायझर प्लांट, एम्स गोरखपूर आणि ICMR- रिजनल मेडिकल रिसर्च सेंटरचं उद्घाटन केलं.