नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदान व्यवस्थापनाच्या सुलभीकरणावर भर दिला जात असून त्यासाठी १०० दिवसांत २१ नवीन उपक्रम सुरू करण्यात आले आहेत, असे आयोगाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले. या उपाययोजनांमध्ये प्रक्रियात्मक सुधारणा, प्रशिक्षण कार्यक्रम आणि मतदारांचा जास्तीत जास्त सहभाग करून घेणे, आदींचा समावेश आहे, असे त्यांनी नमूद केले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळातील पहिल्या १०० दिवसांमध्ये हे उपाय समाविष्ट करण्यात आले आहेत, असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले. मतदारांच्या संख्येत वाढ करण्यासाठी आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची कमाल संख्या १,५०० वरून १,२०० करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मोठ्या नागरी वसाहती आणि उंच इमारती असलेल्या दाट लोकवस्तीच्या भागात अतिरिक्त मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत.
कोणत्याही मतदाराला मतदान करण्यासाठी दोन किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करावा लागणार नाही, याची खात्री करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. निवडणूक सेवा नागरिकांना सुलभतेने उपलब्ध व्हाव्यात यासठी नवीन एककेंद्री एकत्रित डॅशबोर्ड ‘ईसीआयएनईटी’ विकसित करण्यात येणार असून, त्यात विद्यामान ४० हून अधिक अॅप्लिकेशनऐवजी एकाच ठिकाणी सर्व सेवा प्रदान करण्यात येणार आहेत. निवडणूक प्रक्रियेत २८ श्रेणीतील राजकीय पक्षांसाठी एक व्यापक प्रशिक्षण चौकट विकसित करण्यात आली आहे.
हे प्रशिक्षण लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५० आणि १९५१ च्या तरतुदींवर आधारित आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्या मुख्यालयात बायोमेट्रिक उपस्थिती, ई-ऑफिस प्रणाली सक्रिय केली आहे. तसेच नियमित ‘सीईओ’स्तरीय आढावा बैठका घेतल्या आहेत. हे उपाय अंतर्गत समन्वय आणि कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी केले असल्याचे आयोगाने म्हटले आहे.