उत्तर प्रदेशात चकमकीदरम्यान आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पोलीस उपअधीक्षकाचाही समावेश आहे. कानपूर येथे पोलीस विकास दुबे या गुंडाला अटक करण्यासाठी गेली असता ही चकमक उडाली. विकास दुबे याच्यावर ६० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. पोलीस बिकरु गावात विकास दुबेच्या शोधात गेली असता गुंडांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये पोलीस उपअधीक्षकासह आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांचं पथक विकास दुबेचा शोध घेत होते. त्याच्या जवळ पोहोचणार इतक्यात इमारतीवरुन पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार सुरु झाला. या हल्ल्यात पोलीस उपअधीक्षक देवेंद्र मिश्रा यांच्यासह तीन पोलीस उपनिरीक्षक आणि चार कॉन्स्टेबल यांचा मृत्यू झाला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शहीद झालेल्या पोलिसांसाठी शोक व्यक्त केला आहे. सोबतच आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.