West Bengal Assembly Election: पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपाचा पराभव करत तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या. भाजपाचे अनेक मोठे नेते मैदानात उतरलेले असतानाही ममता बॅनर्जी यांनी दिलेल्या लढ्याचं कौतुक करण्यात आलं. मात्र ममता बॅनर्जी यांच्या विजयात एका व्यक्तीचा महत्वाचा वाटा होता. राजकीय सल्लागार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यामुळेच ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा विजयाला गवसणी घातली. मात्र ममता बॅनर्जी यांच्या विजयानंतर प्रशांत किशोर यांनी राजकीय रणनीतीकार म्हणून आपण निवृत्ती घेत राजकारणाला रामराम ठोकला होता. या संपूर्ण चर्चेचं कारण म्हणजे प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली भेट.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रशांत किशोर यांनी भाजपा पश्चिम बंगाल निवडणुकीत दोन अंकी आकडा पार करु शकणार नाही असं भाकीत वर्तवलं होतं. जर भाजपाने दोन अंकी आकडा ओलांडला तर आपण संन्यास घेऊ असं त्यांना जाहीर केलं होतं. पण आपलं भाकीत खरं ठरल्यानंतरही त्यांनी संन्यास घेत असल्याची घोषणा केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. यावर बोलताना त्यांनी आपल्याला संन्यास घ्यायचा होता, त्यासाठी योग्य संधीची वाट पाहत होतो. पश्चिम बंगालच्या निमित्ताने ही संधी मिळाली असल्याचं सांगितलं होतं.

शरद पवारांच्या भेटीसाठी प्रशांत किशोर ‘सिल्व्हर ओक’वर दाखल

“मला बाहेर पडायचं आहे. राजकीय रणनीतीकार म्हणून काम करण्याची माझी इच्छा नाही,” असं प्रशांत किशोर यांनी सांगितलं होतं. प्रशांत किशोर यांनी इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटीमधून (I-PAC) आपण बाहेर पडत असल्याचं स्पष्ट करताना तिथे अनेक हुशार लोक असून ते योगदाने देतील, पण मी संन्यास घेत आहे असं म्हटलं होतं.

“भाजपा १०० जागा जिंकणार सांगत संन्यास घेण्याची मागणी करुन ट्रोल करणाऱ्यांना मला सांगायचं आहे की, आमचा विजय होत असतानाही आणि भाजपा १०० च्या पुढे जाऊ शकलेली नसतानाही मी बाहेर पडत आहे,” असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं होतं. दरम्यान यावेळी त्यांनी सर्व राजकीय पक्षांना निवडणूक आय़ोगाविरोधात एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. निवडणूक आयोग भाजपाचा विस्तारित भाग असल्याप्रमाणे काम करत असल्याचं ते म्हणाले होते.

शरद पवारांची भेट कशासाठी?
२०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर विरोधकांचा चेहरा कोण असणार यासंबंधी सध्या विरोधी पक्षांमध्ये चर्चा सुरु आहे. लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची भाजपाविरोधात मोर्चेबांधणी सुरु असून यादरम्यान प्रशांत किशोर आणि शरद पवारांमध्ये होणारी ही भेट महत्वाची मानली जात आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्तरावर विरोधकांची आघाडी निर्माण करण्यासाठी चर्चा सुरु होईल असं सांगितलं होतं. त्यामुळे मोदी आणि भाजपासमोर विरोधकांकडून कोणते चेहरे असावेत यासंबंधीही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. प्रशांत किशोर यांनी आतापर्यंत नरेंद्र मोदी, जगनमोहन रेड्डी, कॅप्टन अमरिंगर सिंग, ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षासाठी रणनीतीकार म्हणून काम केलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election strategist prashant kishor after bjp defeat in west bengal assembly election 2021 sgy
First published on: 11-06-2021 at 11:09 IST