Bhupesh Baghel son arrest छत्तीसगडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. मद्य घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि वरीष्ठ नेते भूपेश बघेल यांच्या मुलाला अटक केली आहे. ईडी अधिकाऱ्यांनी पहाटे टाकलेल्या छाप्यानंतर चैतन्य बघेल यांना भिलाई येथील त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेण्यात आले आहे. भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात झालेल्या कथित मद्य घोटाळा प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे.
प्रकरण काय?
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील कथित घोटाळ्यात २१०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा गैरव्यवहार झाला होता. ईडीची अशी माहिती आहे की, घोटाळ्यातील निधीचा काही भाग चैतन्य बघेल आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी चालवलेल्या रिअल इस्टेट कंपन्यांद्वारे लाँडरिंग करण्यात आला होता. ईडीचा मनी लाँडरिंग खटला छत्तीसगड भ्रष्टाचार विरोधी ब्युरो (एसीबी) ने नोंदवलेल्या प्रथम माहिती अहवालावर (एफआयआर) आधारित आहे. या अहवालात माजी उत्पादन शुल्क मंत्री कवासी लखमा यांच्यासह ७० व्यक्ती आणि संस्थांची राज्याच्या मद्य धोरणाशी संबंधित भ्रष्टाचारात कथित भूमिकेसाठी नावे आहेत.
भूपेश बघेल यांची केंद्र सरकारवर टीका
अटक आणि छाप्यावर प्रतिक्रिया देताना भूपेश बघेल यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आणि केंद्र सरकार विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले.बघेल यांनी रायपूरमधील माध्यमांना सांगितले, “विधानसभेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, जेव्हा आम्ही सभागृहात अदानी मुद्दा उपस्थित करण्याच्या तयारीत होतो, तेव्हा मोदी आणि शहा यांनी त्यांच्या मालकांना खूश करण्यासाठी ईडीला माझ्या घरी पाठवले. ते देशभरातील विरोधी नेत्यांना लक्ष्य करत आहेत. लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत आहेत,” असे बघेल म्हणाले.
त्यांनी केंद्र सरकारद्वारे ईडी, सीबीआय, आयकर आणि डीआरआय सारख्या तपास संस्थांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “एकीकडे निवडणूक आयोग बिहारमधील मतदारांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित करत आहेत, तर दुसरीकडे या संस्थांना विरोधी पक्षांवर हल्ला करण्यासाठी शस्त्र म्हणून वापरले जात आहे. तरीही, आम्ही लोकशाही आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवतो आणि सहकार्य करत राहू,” असे बघेल पुढे म्हणाले.