काँग्रेस नेते सिद्धरमैया यांनी सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांबाबत केलेल्या ट्वीटवरून परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी त्यांना चांगलंच सुनावलं आहे. लोकांचे जीव धोक्यात असताना तरी राजकारण करू नका, असं ते म्हणाले. सिद्धरमैया यांनी सुडानमधील अडकलेल्या भारतीयांबाबत ट्वीट करत भारत सरकारवर गंभीर आरोप केले होते.

हेही वाचा – Sudan Conflict : सुदानमधील संघर्षांत बळींची संख्या ९७ वर

सिद्धरमैया यांनी काय म्हटलं होतं?

“सुदानमधील गृहयुद्धात एका भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि ६० पेक्षा अधिक जण अडकले आहेत. यामध्ये कर्नाटकमधील ३१ भारतीय आदिवासी नागरिकांचा समावेश आहे. त्यांच्याकडे पुरेसं अन्न आणि पाणीही नाही. मात्र, केंद्र सरकारने त्यांना परत आणण्यासाठी अद्याप कोणतेही कार्यवाही केलेली नाही. भाजपा सरकारने त्वरीत सुदान सरकारशी चर्चा करून त्यांना परत मायदेशी आणावे”, असं ट्वीट काँग्रेस नेते सिद्धरमैया यांनी केले होते.

हेही वाचा – सुदानमध्ये भारतीय नागरिकांना घराबाहेर पडू नका असे का सांगितले? सुदानमध्ये गृहयुद्ध का छेडले गेले?

जयशंकर यांचं सिद्धरमैयांना प्रत्युत्तर

दरम्यान, सिद्धरमैया यांच्या ट्वीटनंतर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. “सुदानमधील भारतीयांचा जीव धोक्यात आहे. अशा परिस्थितीत राजकारण करू नये. सुदानमधील परिस्थितीवर भारत सरकार नजर ठेऊन आहे. तिथे अडकलेल्या भारतीयांना देशात परत आणण्यासाठी भारत सरकारतर्फे प्रयत्न केले जात आहेत”. असं ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुदानमध्ये सध्या गृहयुद्धसदृष्य स्थिती आहे. यापार्श्वभूमीवर सुदानमधील भारतीय दुतावासाने तेथील भारतीयांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय नागरिकांनी घरातच राहावे, विनाकारण बाहेर पडू नये आणि दुतावासाकडून मिळणाऱ्या अपडेटवर लक्ष ठेवावे, अशा सुचना भारतीय दुतावासाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच जे भारतीय नागरीक सुदानला जाण्याचा विचार करत आहेत, त्यांनी आपली योजना पुढे ढकलावी, असेही दुतावासाने म्हटलं आहे.