Franco Di Maria Jayendranatha Italian Hindu Union President : काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार पाकिस्ताविरोधात आक्रमक झालं आहे. दरम्यान, भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर ही मोहीम हाती घेत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. पाठोपाठ पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी, त्यांचा दहशतवादाला पाठिशी घालणारा खरा चेहरा जगासमोर आणण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय खासदारांची व माजी सनदी अधिकाऱ्यांची मिळून सात शिष्टमंडळे तयार केली आहेत. ही शिष्टमंडळे जगभरातील अनेक राष्ट्रांना भेटी देत आहेत. तिथल्या माध्यमांसमोर, सरकारी अधिकारी व बुद्धिजीवी लोकांसमोर जाऊन भारताची बाजू मांडत आहेत.

भारताचं एक शिष्टमंडळ नुकतीच इटलीची राजधानी रोम येथे दखल झालं. यावेळी इटालियन हिंदू युनियनने भारताच्या शिष्टमंडळाचं स्वागत केलं. त्यानंतर रोम येथील एका कार्यक्रमात इटालियन हिंदू युनियनचे अध्यक्ष फ्रँको दी मारिया जयेंद्रनाथ यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “इटलीतील दोन लाख हिंदू नागरिक भारताबरोबर आहेत”. तसेच त्यानी भारताने दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवईचं कौतुक केलं.

“हिंदू धर्माला ओळख व मान्यता मिळालेला इटली हा युरोपातील एकमेव देश”

इटालियन हिंदू युनियनचे अध्यक्ष म्हणाले, “हिंदू हा इटलीमधील मान्यताप्राप्त धर्म आहे. आम्ही इटलीमधील दोन लाखांहून अधिक हिंदूंनी इटालियन प्रजासत्ताकाबरोबर करार केला आहे. या करारामुळे आम्ही देशात आमच्या धार्मिक गोष्टी करू शकतो. आमच्या धर्माला आर्थिक मदत करू शकतो. जसे की इतर धर्मातील लोक त्यांच्या धर्मासाठी दानधर्म करतात, कर भरतात. तसेच आम्ही देखील आमच्या धर्मासाठी योगदान देऊ शकतो. हिंदू धर्माला अशा पद्धतीने ओळख व मान्यता मिळालेला इटली हा युरोपातील एकमेव देश आहे”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फ्रँको दी मारिया जयेंद्रनाथ म्हणाले, “भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. आम्ही दहशतवादाच्या विरोधात भारताबरोबर उभे आहोत. आमचं भारतावर खूप प्रेम आहे. कुठल्याही किंतू-परंतुशिवाय आम्ही दहशतवादाविरोधात उभे आहोत. दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराने फत्ते केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेचं आम्हाला कौतुक आहे. दहशतवादाविरोधात लढणं, आपल्याला नागरिकांना सुरक्षित ठेवणं हे प्रत्येक देशातील सरकारचं, तिथल्या लष्कराचं कर्तव्य आहे. ७० च्या दशकात भारताने भारताने आपल्या शत्रूविरोधात केलेली कारवाई ही इतिहासातील मोठी नोंद घेण्यासारखी घटना होती”.